दोन लाख हात कामाच्या प्रतीक्षेत; केवळ 4961 मजुरांनाच रोजगार
| रायगड । सुयोग आंग्रे ।
रायगड जिल्ह्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात सध्या केवळ 277 कामे सुरू आहेत. या कामांमुळे 4961 हजार मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. एकीकडे कामांची मागणी असताना म्हणाव्या तेवढ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत नाही, असे चित्र आहे. रायगड जिल्ह्यातून लाखो मजूर कामासाठी स्थलांतर करीत असताना जिल्ह्यात केवळ पाच हजार मजुरांना योजनेतून रोजगार मिळत आहे. यामुळे रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य आणि निवडणूक या मूलभूत हक्कापासून या मजुरांना वंचित राहावे लागत आहे.
महात्मा गांधी रोजगार हमी योजना प्रत झाल्यानंतर आतापर्यंत रायगड जिल्ह्यात तीन लाख 34 हजार 746 कामगारांनी आपली नोंद जिल्हा प्रशासनाच्या दरबारात केली आहे. यामध्ये एक लाख 53 हजार 829 महिला मजुरांचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामावर रोजगार मिळविण्यासाठी एक लाख 86 हजार 492 अकुशल मजुरांनी यंदा नव्याने जॉबकार्डसाठी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी आतापर्यंत रायगड जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून एक लाख 30 हजार 811 कामगारांना जॉबकार्ड देण्यात आले आहेत. जॉबकार्ड घेतलेल्या मजुरांमधील 26 हजार 928 मजूर नियमित कामासाठी धावणारे आहेत. तर, एकूण मजुरांपैकी 47 हजार 592 मजूर सक्रिय मजूर आहेत. यामध्ये 20 हजार 74 महिला मजुरांचा समावेश आहे.
रायगड जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडतो. यामुळे जिल्ह्यातील गावांची पीक पैसेवारी पन्नास पैशापेक्षा अधिक आहे. भाताचे कोठार आणि औद्योगिक जिल्हा म्हणून रायगड जिल्ह्याची ओळख आहे. असे असतानादेखील रायगड जिल्ह्यातील लाखो नागरिक वीटभट्टी आणि अन्य कामांसाठी स्थलांतर करीत असतात. यावर्षी तर अनेक शेतकर्यांची कुटुंबे शेतावर उदरनिर्वाह भागत नसल्याने हाताला काम मिळत असल्याने कोळसा गोळा करण्यासाठी जातात. शंभर दिवस कामाची हमी असणार्या रोजगार हमी योजनेची स्थलांतर रोखण्यासाठी मदत होऊ शकली असती. मात्र, मजुरांना वेळेवर कामाचा मोबदला मिळत नसल्याचे गेल्या काही वर्षात अनुभव आल्याने मजूर या कामाकडे पाठ फिरवत आहेत.
नैसर्गिक आपत्तीत गावागावातील बेरोजगारांवर घर सोडून परजिल्ह्यात जाण्याची वेळ येऊ नये म्हणून ‘रोहयो’तून प्रशासनातर्फे कामे उपलब्ध करून दिली जातात. परंतु, सरकारी नोकरदारांना महागाईमुळे महागाई भत्ता वाढीव मिळाला, सातव्या वेतन आयोगानुसार पगारवाढही झाली, मात्र ‘रोहयो’त (रोजगार हमी योजना) काम करणार्यांची मजुरी केवळ 17 रुपयांनी वाढली. भर उन्हात आणि पावसात काम करूनही दररोज 273 रुपयेच मजुरी मिळत आहे. जिल्ह्यात एक लाख 30 हजार 811 जॉब कार्डधारक मजूर आहेत. यामधील 47 हजार 592 मजुरांनी कुठल्या न कुठल्या कामावर यापूर्वी काम केलेले आहे. म्हणजेच हे कार्यरत मजूर आहेत. आज घडीला जिल्ह्यात केवळ 277 रोजगार हमीची कामे सुरू आहेत. त्यावर 4 हजार 961 मजूर कामे करीत आहेत. यावरून रोजगार हमी आणि कामे कमी अशी अवस्था या योजनेची झाली आहे.
रोजगार हमी अन् पगार कमी असे वाक्य प्रचलित झाले असले तरी आता रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांच्या रोजंदारीमध्ये 20 रुपयांनी वाढ झाली आहे. आता रोजगार हमी योजनेवरीला अकुशल मजुरांना 253 रुपयांऐवजी आता 273 रुपये मजुरी मिळणार आहे. यामुळे रायगड जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत जॉब कार्ड मिळविलेल्या 4 हजार 961 मजुरांनी 277 कामांवर रोजंदारी करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात सुरु असेलल्या घरकुलाच्या कामांवर मजुरांनी जाणे पसंत केले असून, सर्वाधिक 3 हजार 354 मजूर घरकुल बांधण्याच्या कामावर मजुरीसाठी जात आहेत.
रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत, सामाजिक वनीकरण, कृषी विभाग आणि वन विभागाच्या माध्यमातून 277 कामे सुरु आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत 95 ग्रामपंचायतींमध्ये सुरु असलेल्या 234 कामांमधून 4 हजार 499 मजुरांना रोजंदारी मिळाली आहे. यामध्ये 212 घरकुलांच्या कामावर 3 हजार 354 मजुरांना रोजंदारी मिळाली आहे. जिल्ह्यात 4 रस्ते, 7 सिंचन विहीर, 9 गुरांचे गोठे आणि 2 शोष खड्डे यांचा समावेश आहे. या सर्व कामांवर 1 हजार 109 मजुरांना रोजंदारी मिळाली आहे. त्याचबरोबर वन विभागामार्फत अलिबाग विभागात रोपवाटिकानिर्मितीचे काम सुरु करण्यात आले आहे. या कामासाठी एका ग्रामपंचायतीमध्ये 30 मजुरांना मजुरीवर काम मिळाले आहे.
रायगड जिल्ह्यात 95 ग्रामपंचायतींमध्ये 234 घरकुलांचे कामे सुरु असून, त्या कामांवर 3 हजार 354 मजुरांना रोजंदारी मिळाली आहे. यामध्ये पनवेल तालुक्यात 10 ग्रामपंचायतीमध्ये 51 घरकुलांवर 161 मजूर, उरण तालुक्यात 1 ग्रामपंचायतीमध्ये 1 घरकुलांवर 7 मजूर, पेण तालुक्यात 6 ग्रामपंचायतीमध्ये 28 घरकुलांवर 228 मजूर, कर्जत तालुक्यात 9 ग्रामपंचायतींमध्ये 56 घरकुलांवर 1344 मजूर, खालापूर तालुक्यात 8 ग्रामपंचायतींमध्ये 8 घरकुलांवर 287 मजूर, रोहा तालुक्यात 4 ग्रामपंचायतींमध्ये 6 घरकुलांवर 36 मजूर, सुधागड तालुक्यात 4 ग्रामपंचायतींमध्ये 4 घरकुलांवर 178 मजूर, माणगाव तालुक्यात 9 ग्रामपंचायतींमध्ये 18 घरकुलांवर 359 मजूर, महाड तालुक्यात 6 ग्रामपंचायतींमध्ये 8 घरकुलांवर 162 मजूर, म्हसळा तालुक्यात 10 ग्रामपंचायतींमध्ये 17 घरकुलांवर 404 मजूर आणि मुरूड तालुक्यात 6 ग्रामपंचायतींमध्ये 7 घरकुलांवर 126 मजूर आणि श्रीवर्धन तालुक्यात 4 ग्रामपंचायतींमध्ये 8 घरकुलांवर 62 मजूर रोजंदारीवर काम करीत आहेत.
कृषी विभागामार्फत रायगड जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायतींमध्ये फळबाग लागवडीचे नियोजन करून 41 ठिकाणी काम सुरु करण्यात आले असून, 428 मजुरांना रोजगार मिळाला आहे. यामध्ये अलिबाग तालुक्यात 9 ग्रामपंचायतींमध्ये सुरु असलेल्या 15 कामांवर 157 मजूर, पेण तालुक्यात 2 ग्रामपंचायतींमधील 22 कामांवर 248 मजूर, कर्जत तालुक्यात 2 ग्रामपंचायतींमधील 2 कामांवर 4 मजूर, तळा तालुक्यात 1 ग्रामपंचायतीमधील 1 कामांवर 14 मजूर आणि श्रीवर्धन तालुक्यात एका ग्रामपंचायतीमधील एका कामावर 5 मजुरांना रोजंदारीची संधी मिळाली आहे. सामाजिक वनीकरण विभागामार्फत जिल्ह्यात पनवेल तालुक्यातील एका ग्रामपंचायतीमध्ये एक काम सुरु असून, 4 मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे.







