वीज यंत्रणेच्या दुरुस्तीचा आढावा घेणार
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अतिवृष्टीमुळे महावितरण व महापारेषणच्या कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील वीज यंत्रणेचे अतोनात नुकसान झाले असून महाड, नागोठणे व पेण येथील नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत हे उद्या या परिसराचा दौरा करणार आहेत.
मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील 1927 गावे व शहरातील 9 लाख 60 हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला असून महावितरणच्या कर्मचार्यांनी भर पावसात व पूरात साडेसहा लाख ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत केला आहे. रात्रंदिवस युद्धपातळीवर दुरुस्तीचे कामे सुरू असून लवकरच उर्वरित भागाचा वीज पुरवठा सुरळीत होणार आहे.
पावसामुळे प्रभावित क्षेत्रातील एकूण 14 हजार 737 रोहित्रे बंद पडली असताना 9 हजार 262 रोहित्रे सुरू करण्यात यश आले आहे. बंद झालेल्या 474 वीज वाहिन्यांपैकी आता268 वीज वाहिन्या चालू करण्यात आलेल्या आहेत. बंद पडलेल्या 67 वीज उपकेंद्रे व स्वीचिंग केंद्रापैकी 44केंद्रे ही पूर्ववत करण्यात यश मिळाले आहे. दोन अतिदाब उपकेंद्रापैकी एक उपकेंद्र आता चालू झालेला आहे.
प्रलयात जलमय झालेल्या परिसरातील महावितरणची संपूर्ण वितरण प्रणालीच पाण्यात बुडाली. अनेक भागात तारांसह पोल जमीनदोस्त झाले. नदीला पुरामुळे आलेले तुफान झेलत, डोंगर दर्यातून अवजड पोल, रोहित्रे व इतर अवजड सामग्री खांद्यावर वाहून नेऊन महावितरणच्या जिगरबाज कर्मचार्यांनी बहुतांश भागाचा वीज पुरवठा सुरळीत केल्याबद्दल त्यांच्या या कामगिरीचे ऊर्जामंत्री डॉ राऊत यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
महाड येथे महापारेषणचे दोन टॉवर पडले असल्याने संपूर्ण महाड तालुका अंधारात बुडाला आहे. मात्र पर्यायी व्यवस्था करत दवाखाने व पाणीपुरवठा योजनेला वीज पुरवठा उपलब्ध करून दिलेला आहे. तसेच उद्या सकाळ पर्यंत चक्राकार पद्धतीने महाड शहरातील ग्राहकांना वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे.
डॉ राऊत हे प्रत्यक्ष महाड, पेण, नागोठणे या भागात जाऊन वीज कर्मचार्यांशी संवादही साधणार असून त्यांच्या अडचणीही जाणून घेणार आहे. तसेच प्रभावित क्षेत्रातील भागात दुरूस्तीसाठी त्वरित साहित्य व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी महावितरण व्यवस्थापनाला दिल्या आहेत. आपल्या या दौर्यात ते पूरग्रस्त गरजवंताना जीवनावश्यक साहित्याचे वाटपही करणार आहेत. महाड येथे दिवंगत काँग्रेस नेते माणिकराव जगताप यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देणार आहेत. यानंतर ते माध्यम प्रतिनिधीसोबत संवादही साधणार आहेत.