शेकापक्षातर्फे माणिक जगताप यांना श्रद्धांजली
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा रायगड जिल्हा अध्यक्ष माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या आकस्मित निधनाबद्दल शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने महावितरण कंपनीच्या सक्तीच्या विजबिज वसूली विरोधात माजी आमदार पंडित पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणारे धडक आंदोलन रद्द करुन स्व. माणिकराव जगताप यांना एका सभेचे आयोजन करीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पंडित पाटील यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य भावना पाटील, तालुका चिटणीस अनिल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य द्वारकानाथ नाईक, अनिल गोमा पाटील, प्रफुल्ल पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना शेतकरी कामगार पक्षाचे नेेते माजी आमदार पंडीत पाटील म्हणाले की, माणिक जगताप हे हुशार अभ्यासू व्यक्तीमत्व पण पक्षाने कोणतेच पद दिले नाही कायम अन्याय तरीही घरात बसून न राहता दक्षिण रायगडमध्ये चांगले प्रभावी काम केले. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये चांगले काम केले. हसतमुख नेता आपल्यातून गेला यावर विश्वासच बसला नाही. सुनील तटकरे यांना खासदार करण्यात माणिक जगताप यांचे फार मोठे योगदान आहे. दुदैवाने त्यांचा विधानसभेत पराभव झाला. तरीही पराभवाने त्यांनी न खचता पक्षाचे काम सुरु ठेवले होते. फक्त रायगडचे नव्हे तर महाराष्ट्राला हवेहवेसे वाटणारे व्यक्तीमत्व होते. रायगड तसेच काँगे्रस पक्षाची मोठी हानी झाली आहे.
पक्षीय राजकारण न करता खेळाडू वृत्तीने काम करण्याची पद्धत कुठलीच सत्ता नसतानाही मोठया प्रमाणावर मते मिळवली. माणिकराव जगताप सोडून जातील असे वाटले नाही. कोरोनाने रायगडचा फार मोठा घात केला. चांगले कार्यकर्ते नेले. पिंटया शेट गेले, कर्जतचे तालुका चिटणीस, सतीश कदम असे अनेक नेते गेले. कोणाचा भरवसा नसल्याने एकमेकांसोबत चढाओढ करु नका. हवे हवेसे वाटणारे व्यक्तीमत्व हिरावले. मी नेहमी संपर्कात होतो. माझ्यावर भावाप्रमाणे प्रेम केले. माझ्या चांगल्या कामाचे नेहमी कौतुक केले. जुलै महिना फार घातक ठरला. मधूशेठ ठाकूर यांच्यानंतर माणिकराव जगताप हे हिरावून नेली. समाजाच्या शेवटच्या घटकासाठी या दोन्ही नेत्यांनी कायम काम केले असल्याचे त्यांनी आवर्जून नमुद केले.
माजी जिल्हा परिषद सदस्य द्वारकानाथ नाईक यांनी आपल्या भावना व्यक्त करताना त्यांचे आमच्यावर कुटूंबाप्रमाणे प्रेम होते. त्यांच्या जाण्याने आमच्या परिवारातील एक व्यक्ती गेल्याचे दुःख झाले आहे. ते माझे एक सच्चे मित्र असे होते. त्यांच्या जाण्याने रायगड जिल्हयाची अपरिमित हानी झाली आहे. जी कधीही भरुन निघणारी नाही. तरमाजी उपसभापती अनिल गोमा पाटील यांनी माणिकराव जगताप यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजी अर्पण केली.