ईर्शाळवाडी गृहप्रकल्प हस्तांतरण लवकरच

सिडको व्यवस्थापकीय संचालकांना विश्‍वास

। पनवेल । वार्ताहर ।

राज्य रस्ते विकास महामंडळाने या पुनर्वसित वाडीचा आराखडा बनविल्यानंतर सिडको महामंडळाने नवीन आदिवासीवाडी बांधण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. आदिवासी बांधवांसाठी 44 पक्की घरे बांधण्याचे काम नानिवली गावात अंतिम टप्प्यात सूरु आहे. अजून महिनाभरात या घरांचे बांधकाम व इतर पायाभूत सुविधांचे काम पूर्ण होईल, असा विश्‍वास सिडको मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केला.

मागील वर्षी 19 जुलैच्या अतिवृष्टीत खालापूर येथील डोंगरावरील ईर्शाळवाडी दरडीखाली गाडली गेली. यामध्ये 84 जणांनी त्यांचे प्राण गमावले. या वाडीतील बचावलेल्या 144 आदिवासींचे पुनर्वसन करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी रायगड जिल्हाधिकार्‍यांना केली होती. या घटनेमध्ये 27 जणांचे मृतदेह दरडीखालून काढले तर बचावकार्यानंतरही 57 जणांचे मृतदेह न सापडल्याने त्यांना मृत घोषित करण्यात आल्याने मृतांची संख्या 84 वर पोहचली. याच वाडीतील 31 विद्यार्थी विविध आश्रमशाळेत त्यावेळेस शिक्षण घेत असल्याने ते बचावले. सरकारने 144 आदिवासी बांधव व त्यांच्या कुटूंबियांचे या घटनेनंतर जुन्या मुंबई पुणे महामार्गालगत चौक येथे कंटेनरमध्ये तात्पुरती घरे तयार करुन आदिवासी बांधवांचे पुनर्वसन केले. मागील वर्षभरापासून हे आदिवासी बांधव येथेच राहतात.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिवासी बांधवांच्या पुनर्वसनात कोणतीही कमी पडू नये म्हणून वारंवार सरकारी यंत्रणेकडे आढावा घेतला आहे. सिडको मंडळाने तब्बल 30 कोटी रुपये खर्च करुन या आदिवासी बांधवांचे पुनर्वसनासाठी नवीन ईर्शाळवाडी उभारण्याचे काम झपाट्याने हाती घेतल्याने हे काम पुर्णत्वाकडे आले आहे. नानिवली गावातील 2.6 हेक्टर जमीनीवर या नवीन ईर्शाळवाडी आदिवासी बांधवांना त्यांच्या जुन्या वाडीप्रमाणे प्रशस्त घराची रचना करण्यात आली आहे. नवीन प्रत्येक घराचे क्षेत्रफळ 300 चौरस फूट असणार आहे.

आदिवासी बांधवांना त्यांच्या नवीन घराच्या शेजारी मोकळी जागा आणि सर्व सोयीसुविधा कशा मिळू शकतील, या पद्धतीने सिडको मंडळाने या घरांची व घरा सभोवतालच्या परिसराचा विकास केला आहे. यामध्ये घरांसोबत रस्ते व पिण्याच्या पाण्यासोबत, प्राथमिक शाळा आणि अंगणवाडीचे काम सुरु आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी तीनशे चौरस फूट जागा आणि समाजमंदीरासाठी 305 चौरस फूट जागेवर काम सुरू आहे. तसेच 2720चौरस फूट जागेवर खेळण्यासाठी मोकळे मैदान विकसित केले जात आहे. 500 चौरस फूट जागेवर आदिवासी बांधवांसाठी बगीचा असणार आहे.

Exit mobile version