एकनाथ पुत्रास, अनाथांचा विसर
| खोपोली | संतोषी म्हात्रे |
खालापुरातील इर्शाळवाडीत 19 जुलै 2023 रोजी पावसामुळे दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. तब्बल 84 जण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. या घटनेला आज दोन वर्षे पूर्ण होत आहे. या दुर्दैवी घटनेत कोणाची आई गेली, कोणाचे वडील गेले, तर काहींचे आई-वडील गेल्याने अनेक मुले ‘अनाथ’ झाली आहेत. आईबापाविना पोरकी झाली. दरम्यान, एका सामाजिक संस्थेने अनाथ मुलांना दत्तक घेण्याचे आश्वासन दिले होते. ती संस्था अनाथांचा नाथ म्हणवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र खा. श्रीकांत शिंदेंची असून, त्यांनी दिलेली आश्वासने हवेत विरली असल्याचे इर्शाळवाडी दरडग्रस्त आदिवासी बांधवांनी सांगितले. आई, वडील, भाऊ, बहीण गेल्याने छत्र हरपलेली ‘अनाथ’ मुले आज आश्रमशाळेत धडे गिरवीत आहेत.
दरम्यान, अनाथ मुलांना तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत रोजगार देऊ, असे आश्वासन देण्यात आले होते. तेसुद्धा आश्वासन पाळले गेले नाही, असा आरोप येथील आदिवासी बांधवांनी केला आहे. सिडकोमध्ये अवघ्या दहा तरुणांना कंत्राटी पद्धतीने भरती केले असून, निम्म्याहून अधिक घरीच बसले आहेत, असे यावेळी सांगण्यात आले. जर मुलांना दत्तक घ्यायचे नव्हते, आमच्या तरुणांना नोकरी द्यायची नव्हती, तर प्रसिद्धीसाठी आश्वासन द्यायचे कशाला, असा सवाल आदिवासी बांधवांनी शासनाला केला आहे. नोकरी देण्याचा सरकारला विसर पडला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री, मंत्र्यांनी येऊन दिलेले आश्वासन हवेत विरले असून, नोकरभरतीतही मुले ‘अनाथ’ राहिली असल्याचे समोर आले आहे.
सध्या 139 लोकवस्ती असलेल्या दरडग्रस्तांना शासनाने 43 टुमदार घरे बांधली, पाणी, रस्ता, वीज दिली. मात्र, रोजगार नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. त्यामध्ये विजेचे बिल भरताना नाकीनऊ येत आहे. दरडीखाली नाचणी, वरी, भात पिकणारी 262 दळीभाग कसदार जमीन गाडली गेली आहे. कुटुंबातील सदस्यांसह बैलजोडी, नांगर तसेच दुभती गाय, बकऱ्या मलब्याखाली गाडल्या. भाजीपाला पिकवला जात असणारी परसबागही गेली. सध्या हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे, असे आदिवासी बांधवांचे मत आहे. दरग्रस्तांच्या नावांवर जमीनीचा 7/12 नसल्याने शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही, शेतकरी कर्ज, शेतीची अवजारे इत्यादी योजनांचा लाभ मिळत नसल्याने नवीन वसाहत च्या आसपास जमीन मिळावी, अद्ययावत स्मशानभूमी सह दफनासाठीही जागा उपलब्ध करून देण्याचीही मागणी केली जात आहे.
शासनाने फिरवली पाठ
शासनाने सुरुवातीचे तीन महिने मोफत धान्यपुरवठा, आरोग्य सेवा व गॅस सिलिंडर पुरविले. त्यानंतर इर्शालवाडी दरडग्रस्त दुर्लक्षित राहिले. कामधंद्यासाठी शेजारच्या गावात मोलमजुरी, भांडीकुंडी घासून पोट भरत आहेत. गॅस सिलिंडर पुरवठा होत नसल्याने आदिवासी महिलांना लाकडी सरपणाचा वापर करावा लागत असून, धुराने डोळे पाणावले आहेत. सध्या दरडग्रस्तांना उदरनिर्वाह, नुकसान भरपाईच्या आर्थिक मदतीवर करावा लागत आहे. ती पुंजी संपली तर पुढे काय? अशा चिंतेने दरडग्रस्तांचा दिवस मावळत आहे.
आमची झोपडीच बरी…
तुमच्या राजमहालापेक्षा जंगलातील झोपडीच बरी, त्या ठिकाणी जंगली रानमेवा, मासे, खेकडा, चिंबोऱ्यांवर जीवन जगता तरी येते. आम्हाला आमची झोपडी प्यारी, असे दरड ग्रस्तांचे म्हणणे आहे. कुटुंबातील सदस्यांच्या आठवणींबरोबरच कोणी वालीच नसल्याची भावना आदिवासी बांधवांत झाल्याने दुसऱ्या वर्षश्राद्धात दुःखाने अश्रूंचा बांध थांबता थांबत नाही.
ना. शिंदेंसमोर समस्या मांडणार
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त रविवार, दि. 20 जुलै रोजी खोपोली येणार आहेत. खोपोलीतील समर्थ मंगल कार्यालयात हा मेळावा पार पडणार आहे. त्यावेळी याठिकाणी मोठ्या संख्येने जाऊन आमच्या समस्या त्यांच्यासमोर मांडणार असल्याचे दरडग्रस्त आदिवासी बांधवांनी सांगितले.
शासन आदेशानुसार महसूल प्रशासन वेळोवेळी दरडग्रस्तांच्या मदतीसाठी धावून गेले आहे. विविध योजनांच्या माध्यमातून येथील बांधवांना जास्तीत जास्त मदत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. या पुढे देखील दरडग्रस्तांची कोणतीही हेळसांड होणार नाही, यासाठी प्रयत्नशील राहू.
सुधाकर राठोड,
नायब तहसीलदार, खालापूर







