आडिवलीमध्ये उल्हास नदीत उत्खनन

पुर नियंत्रण रेषेचे सर्व नियम धाब्यावर

। नेरळ । प्रतिनिधी ।

खंडाळा घाटात उगम पावलेली उल्हास नदी ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी समजली जाते. या नदीच्या आसपास कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये असे स्पष्ट निर्देश मुंबई हायकोर्टाचे आहेत. मात्र, तरी देखील नदीमध्ये मातीचे उत्खनन आणि नदीमध्ये असलेली बेट नष्ट करण्याचा धडाका आडीवली तमनाथ भागात सुरू आहे. दरम्यान, राजकीय वरदहस्त असलेले तेथील बांधकाम दिवसेंदिवस अधिक वेगाने सुरू असून अधिकारी कागदी घोडे नाचवत आहेत.

या नदीच्या परिसरात कोणत्याही प्रकारची बांधकामे होणार नाहीत याची काळजी स्थानिक प्रशासनाने घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. मात्र असे असताना थेट पूर नियंत्रण रेषेमध्ये जावून बांधकाम आणि उत्खनन दररोज सुरू असून राजकीय वरदहस्ताने सुरू असलेले नदी पात्रातील बांधकाम कोण थांबविणार? असा प्रश्‍न सर्वसामान्य यांना पडला आहे. तमनाथ आणि आडीवली या भागात सुरू असलेल्या बांधकामांमुळे नदीच्या पलीकडे असलेल्या गावांमध्ये पावसाळ्यात पाणी शिरण्याची शक्यता आहे. मोहीली परिसरातील बहुसंख्य भागात पाणी शिरून नुकसान होण्याची शक्यता आहे. या पूर्वी 150 मीटर रुंदीचे नदीचे पात्र आज फक्त 50 मीटर रुंदीवर येवून ठेपले आहे. त्यामुळे पावसाळ्यात खर्‍या अर्थाने नदीच्या पलीकडे असलेल्या भागातील रहिवाश्यांची धावपळ आणि त्यांच्यासाठी रेस्कु करण्याची वेळ प्रशासनावर येणार हे जवळपास नक्की आहे.

आता तर नदीच्या पात्रात घुसून संबंधित बांधकाम व्यवसायिककडून मातीचे उत्खनन करून गाळ काढला जात आहे. त्या परिसरात गेली आठ दिवस प्रोकलेम मशीनचे साहाय्याने नदीमधून माती काढून बांधकाम केलेल्या ठिकाणी भराव टाकला जात आहे. त्यामुळे जुन्या नदी पात्राचे अवशेष मिटवून टाकण्याचा प्रयत्न संबंधित बांधकाम व्यवसायिक करीत आहेत. दुसरीकडे गाळ भरलेली माती काढून नदीमध्ये अतिक्रमण करण्याचा डाव संबंधित बांधकाम व्यवसायिक आणि जागा मालक यांचा दिसून येत आहे. त्याचवेळी नदीमध्ये वर्षानुवर्षे असलेले बेट देखील उध्वस्त केली जात आहेत. त्यासाठी अवजड मशीनीच्या साहाय्याने ती बेटे नष्ट करून तेथे बोटिंग क्लब उभारण्यासाठी तयारी पूर्ण केली जात आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेली नदीमध्ये प्रदूषण करण्याचा प्रयत्न भविष्यात या ठिकाणी होणार आहे. स्वामित्व शुल्क आणि मार्च अखेर या काळात महसूल विभागाचे तलाठी आणि मंडळ अधिकारी कुठे खोदकाम सुरू आहे, याचा शोध घेत असतात. मात्र, मुख्य रस्त्याच्या कडेला रात्रंदिवस प्रोक्लेम मशीन यांचे सहाय्याने नदीमध्ये घुसून माती काढून अन्य ठिकाणी टाकली जात असताना महसूल विभाग तेथे कारवाई करून आपला महसूल वाढविण्यासाठी आग्रही नाही याचे गणित देखील सर्वसामान्य लोकांच्या कळण्याच्या पलीकडील आहे.

Exit mobile version