| शिहू | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील कोलेटी ग्रामपंचायतीमध्ये जेएसडब्लू कंपनीच्या निधीतून सुमारे 30 लाख रुपये खर्च करून मे मध्ये विकासकामे पुर्ण करण्यात आली होती. परंतु, त्यात करण्यात करण्यात आलेले बांधकाम पहिल्याच पावसात ढसाळल्याने संबंधित कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी कोलेटी ग्रामस्थ करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पेण तालुक्यातील कोलेटी ग्रामपंचायत हद्दीतील निवाचा तलाव येथे डोळवी कंपनीच्या निधीतून तलाव सुशोभीकरणाचे काम करण्यात आले होते. परंतु, हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, साईडवॉल कंपाउंडचे बांधकाम योग्य तांत्रिक निकषानुसार करण्यात आलेले नाही. बांधकामात डबर दगडाचा वापर करण्यात आला असून, सिमेंटचा वापर अत्यल्प प्रमाणात करण्यात आले आहे. तसेच, तलावतील गाळ पूर्णपणे काढण्यात आलेले नसून अंदाजे 20 टक्केच माती काढण्यात आली आहे. तसेच, तलावासाठी आवश्यक असलेल्या पायऱ्या व गणपती विसर्जणासाठी घाट तयार करण्यात आलेला नाही. परिणामी पहिल्याच पावसात बांधकामाचा काही भाग कोसळला असून, कामाच्या गुणवत्तेचा बोजवारा उडल्याचे स्पष्ट झाले आहे.







