शेकाप नेते पंडित पाटील यांच्या मागणीची दखल
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
माणगाव येथील शेकापच्या भात खरेदी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी शेकापनेते माजी आमदार पंडित पाटील यांनी शेतकर्यांना हमीभाव मिळाला पाहिजे अशी मागणी करतानाच ऑनलाईन भातखरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी देखील केली होती. यासंदर्भात त्यांनी शासनाकडे पाठपुरावा देखील पुर्वीच केला होता. त्यानुसार या मागणीची दखल घेत शासनाने आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गत ऑनलाईन भातखरेदीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रायगडसह राज्याला लाभ होणार असून शासनाच्या या निर्णयाचे पंडित पाटील यांनी स्वागत करीत धन्यवाद दिले आहेत.
पुरेशा प्रमाणावर शेतकर्यांच्या नोंदी झाल्या नसल्यास किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित राहण्याची शक्यता होती. त्यामुळे रायगडसह नाशिक, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, पालघर व ठाणे या जिल्ह्यांमध्ये किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गत शेतकर्यांच्या नोंदीकरीता 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
तसेच यापुढे पणन हंगाम 2021-22 मध्ये शेतकरी नोंदणीकरीता मुदतवाढ देण्यात येणार नाही. शेतकरी नोंदणीबाबतची माहिती जास्तीत जास्त शेतकर्यांपर्यंत पोहचवण्याकरीता प्रयत्न करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
माजी आमदार पंडित पाटील यांनी याबाबत सर्वप्रथम मागणी केल्याने रायगड जिल्ह्यातील शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शेकाप युवा नेते माणगाव तालुका शेतकरी खरेदी विक्री खरेदी संघाचे सभापती निलेश थोरे पाटील यांनी शेतकर्यांच्या वतीने पंडित पाटील यांना धन्यवाद दिले आहेत.