24 फेब्रुवारीला आमरण उपोषणाचा इशारा
| पनवेल | प्रतिनिधी |
तोंडरे येथील हायकल कंपनीच्या गेटसमोर 24 फेब्रुवारी रोजी शेतकरी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण करणार आहेत. माजी आ. बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपोषण करण्यात येणार आहे.
कंपनीतील स्क्रॅपचे काम, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे काम, बॉयलरची राख बाहेर काढण्याचे काम, फोरक्लिप, हायड्रा, रुग्णवाहिका ई. लागणारी वाहने कंपनीस पुरवण्याचे काम, कंत्राटी कामगार पुरवण्याचे काम मिळावे या सर्व कामांमध्ये भूमीपुत्रांना समाविष्ट करावे, या मागण्यांसाठी हे उपोषण केले जाणार असून याबाबतच्या प्रति तहसील, प्रांत अधिकारी, तळोजा पोलीस ठाणे, हायकल कंपनी, पोलीस उपायुक्त, पोलीस कमिशनर यांना देण्यात आलेल्या आहेत.
तळोजा एमआयडीसीत हायकल कंपनी ही येथील शेतकर्यांच्या जमिनीवर स्थापन झालेली आहे. या कंपनीतील कामांमध्ये प्रकल्पग्रस्त, भूमीपुत्र शेतकरी यांना समाविष्ट करून घेण्यात यावे यासाठी शेतकरी 1999 पासून संघर्ष करत आहेत. त्यासाठी संबंधित अधिकारी आणि कंपनी व्यवस्थापन यांच्याकडे पत्रव्यवहारदेखील करण्यात आले आहेत. 2024 रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे तक्रार केलेली असून, ही कंपनी येथील शेतकर्यांच्या जमिनीवर स्थापन झाल्याची माहिती महामंडळाने माहिती दिलेली असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. मात्र, शेतकर्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. देशाच्या विकासासाठी जमिनी त्याग करणार्या भूमीपुत्र शेतकर्यांकडे उदरनिर्वाहाचे साधन न राहल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या प्रकल्पामध्ये दहा ते बारा कुटुंबं अवलंबून असताना भूमीपुत्र, प्रकल्पग्रस्त शेतकर्यांवर कंपनी स्थापनेकडून अन्याय होत असल्याचा आरोप शेतकरी करत आहे. गतवर्षी शेतकरी चर्चेसाठी मागणी करत असताना यावेळी शेतकर्यांना 50 टक्के स्क्रॅपमध्ये भागीदारी देऊ असे सांगण्यात आले होते. मात्र, इतर मागण्यांवर कोणत्याही प्रकारची चर्चा केली नाही. कंपनी व्यवस्थापन शेतकर्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता हायकल कंपनी गेटसमोर शेतकरी आमरण उपोषण करणार आहेत.