मोजणीसाठी आलेल्या ठेकेदार व अधिकार्यांना पळविले
। पाली / बेणसे । वार्ताहर ।
पालीतील सातत्याने वाहतूक कोंडीचा तिढा सोडवण्यासाठी बायपास मार्गाचा पर्याय उभा केला जात आहे. मात्र नव्याने होऊ घातलेल्या पाली-झाप-बलाप बायपास मार्ग हा आमच्या शेतजमिनी उद्ध्वस्त करणार असल्याचा संताप येथील स्थानिक शेतकर्यांनी व्यक्त केला आहे. शेतकर्यांच्या तक्रारींचे जोपर्यंत निवारण होत नाही, तोपर्यंत शेतात कुणालाही पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा देत स्थानिक शेतकर्यांनी मोजणीसाठी आलेल्या अधिकार्यांना शेतकर्यांनी ठणकावले
विकासाच्या नावाखाली शेतकरी देशोधडीला लागणार असेल तर प्राण गेले तरी चालेल आम्ही मागे हटणार नाही, असा संताप शेतकर्यांनी व्यक्त केला. आम्हाला विश्वासात घेतल्याखेरीज भूसंपादनाची कोणतीही प्रक्रिया करू नये अशी मागणी शेतकर्यांनी केली. जोपर्यंत आम्हा शेतकर्यांना समाधानकारक मोबदला मिळत नाही तोपर्यंत आमच्या शेतात पाय ठेऊ देणार नाही असा इशारा संतप्त शेतकर्यांनी दिलाय. यावेळी जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी येथील मंगेश कदम, लक्ष्मण कांबळे, पांडू राऊत, श्रीरंग काटकर, सुजित काटकर, बाळकृष्ण लखीमले, वसंत गडगे, तुकाराम गडगे, विठ्ठल ठोंबरे, अनंत लांगी, बाळू काटकर, सुरेश गायकवाड, बाळा परब, यशवंत काटकर, उमाजी राऊत,जयंता गडगे, दत्तात्रेय गोळे, दीपक चव्हाण, सीताराम जाधव,निलेश जाधव, जितेंद्र गद्रे आदी शेतकरी उपस्थित होते.
- शेतकर्यांच्या प्रश्नावर प्रशासन स्थरावर बैठका घेऊन त्यांची बाजू समजून घेतली आहे. सध्या शेतकर्यांच्या तक्रारी येत असून तक्रारीच्या अनुषंगाने तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रशासन स्थरावर आम्ही प्रयत्न करू. – दिलीप मदने, शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पाली सुधागड
- अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लावण्यासाठी पाली झाप बलाप यामार्गे बाह्यवळण मार्ग निर्माण होत आहे. यासाठी शेतकर्यांच्या काही तक्रारी असतील तर बैठकीचे पुन्हा नियोजन करून योग्य तोडगा काढला जाईल. – दिलीप रायन्नावार तहसीलदार पाली सुधागड