वाढलेल्या गवतामुळे पुल दिसेना
। सुतारवाडी । वार्ताहर ।
सुतारवाडी पासून पाच कि.मी. अंतरावर जावटे गाव आहे. येथून माणगाव, निजामपुर, इंदापुर, भाले या मार्गाकडे जाणारा सुसज्ज रस्ता आहे. या रस्त्याला छोटासा पुल आहे. या पुलाला कठडे नसल्याने येथे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. तसेच पुलाच्या दोन्ही बाजुला वाढलेल्या गवतामुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही.
पूर्वी या पुलाला संरक्षक कठडे होते. मात्र गेल्या दहा वर्षापासून येथील संरक्षक कठडे गायब झालेले आहेत. पावसाळ्यात सर्वत्र गवत उगवल्याने दोन्ही बाजू झाकून गेलेल्या अवस्थेमध्ये आहेत. मुख्य म्हणजे या पुलावरून दुचाकी, चारचाकी वाहनं तसेच एस.टी.ची गाडी जात असते. एखाद्या वेळेस या पुलावर दोन वाहने आली किंवा साईड काढण्यासाठी एखादे वाहन गेले तर ते पुलाखाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे धोका टाळण्यासाठी तसेच अपघात होण्यापूर्वी संबंधित खात्याने लक्ष देऊन या छोट्याशा पुलाला कठडे बांधण्याची मागणी जोर धरीत आहे.