‘भाताची कोठार’ होऊ लागली ‘पर्यटन निवास’

भातशेती लागवडीचे प्रमाण घटले

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

‘भाताचे कोठार’ अशी ओळख असलेल्या श्रीवर्धन तालुक्यात आता झपाट्याने बदल होत असून भातशेती लागवडीचे प्रमाण घटले आहे. शेतकरी आता पर्यटन व्यवसायाकडे वळू लागला असून भातशेतीच्या अनेक जमिनीवर पर्यटन निवास दिसायला लागली आहेत.

अधिक ज्येष्ठाचे वेध लागले की शेतकरी वर्गाची जमीन मशागत, भातबीयाणे खरेदी व पेरणी साठी लगबग असायची. मात्र, बदलतं हवामान, मजुरांची टंचाई, वाढलेला उत्पादन खर्च आणि त्या तुलनेत भाताला मिळणारा कमी भाव यांमुळे शेतकरी हवालदिल झाला होता. पारंपरिक शेती आता आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने शेतकऱ्यांना पर्यटन व्यवसाय या माध्यमातून वर्षभर खात्रीशीर उत्पन्नाचे स्रोत मिळाले आहे. पर्यटन व्यवसायातील बारमाही नफा ओळखून बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या जमिनींवर पर्यटन निवास उभारण्यास सुरुवात केली. ज्या जमिनींवर कधीकाळी भाताची सुगी व्हायची, तिथे आता रिसॉर्ट्स, हॉटेल्स उभी राहिली आहेत.

भातशेती कमी होण्याची कारणे –
श्रीवर्धन तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर तरुण पिढी नोकरी-रोजगारासाठी मुंबई, पुणे शहरात स्थलांतरित झाली आहे.या मुळे गावांत केवळ वयोवृद्ध शेतकरी राहिले असून शेतीसाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ मिळेनासे झाले आहे.

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका भात शेतीला सर्वाधिक बसत आहे. ऐन भात कापणीच्या काळात दरवर्षी परतीचा मुसळधार पाऊस किंवा अवकाळी पाऊस हजेरी लावतो. यामुळे हातातोंडाशी आलेले भात पीक शेतातच कुजते किंवा जमिनीवर लोळते.

ग्रामीण आणि डोंगराळ भागांमध्ये रानडुक्कर, माकडे आणि इतर वन्यप्राण्यांचा उपद्रव खूप वाढला आहे. रात्रीच्या वेळी रानडुकरे उभी पिके नष्ट करतात. वर्षभर मेहनत करूनही एका रात्रीत पीक उद्ध्वस्त होत असल्याने बहुतांश शेतकरी भात शेती करण्याऐवजी जमीन पडीक ठेवणे पसंत करत आहेत.

पर्यटनस्थळ म्हणून श्रीवर्धनचा विकास होत असल्याने जमिनींचे भाव गगनाला भिडले आहेत. काही शेतकऱ्यांनी आपल्या भात शेतीच्या जमिनी मुंबई-पुण्यातील विकासक किंवा गुंतवणूकदारांना विकल्या आहेत. या जमिनींवर आता रिसॉर्ट्स, फार्महाऊस किंवा इतर बांधकामे उभी राहत आहेत, ज्यामुळे शेतीचे क्षेत्र कमी झाले आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील भातशेतीचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालल्याने भविष्यात तांदूळासाठी इतर तालुक्यांवर अवलंबून रहावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शेतकरी वर्गाची निराशाजनक प्रतिक्रिया
भात शेतीसाठी ट्रॅक्टरने नांगरणीचे दर परवडत नाही. मशागत, पेरणी आणि कापणीकरीता मनुष्यबळाची आवश्यकता असते. परंतु मनुष्यबळाची कमतरता, वाढते मजुरी दर त्यातच बियाणे व खते यांचे वाढणारे दर. त्या तुलनेत भाताला बाजारभाव कमी मिळतो. शेतीत जितका पैसा टाकतो, तितका परतावा मिळत नाही. यामुळे शेतकरी वर्ग इतर पर्याय शोधू लागले आहेत, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून उमटत आहे.
Exit mobile version