दोन महिन्यांपासून परीक्षांमुळे व्यवसाय ठप्प
। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. पर्यटन व्यवसाय ठप्प झाल्यामुळे पर्यटन व्यवसायावर आधारित असणार्या अनेक घटकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते. तीन आसनी रिक्षाचालक, मच्छी विक्रेते, पर्यटन व्यवसायिकांकडे कामासाठी जाणार्या महिला व पुरुष यांना पर्यटक येत नसल्यामुळे काम उपलब्ध होत नव्हते. आता बोर्डाच्या परीक्षा संपल्या असून आगामी शनिवार, रविवारपासून पर्यटन व्यवसाय प्रगतीपथावर सुरू होऊन बहरेल असा विश्वास पर्यटन व्यवसायिकांमधून व्यक्त केला जात आहे.
तालुक्यातील नागरिकांचा मुख्य यवसाय पर्यटन व्यवसाय व मच्छिमारी हाच असल्याने बहुतांश नागरिकांची उपजीविका या व्यवसायांवर अवलंबून आहे. जे शेतकरी भात पिकवतात त्यांचे फक्त पावसाळ्यात भात पिकवण्याचे काम असते. सध्या मोकाट गुरे व घोडे यांच्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकर्यांनी कडधान्याची पिके घेण्याचे सोडून दिले आहे. आंबा व काजू बागायतदारांना देखील त्यांच्या ठराविक मोसमा पर्यंतच उत्पन्न मिळत असते.
आंबा व काजूचा मोसम संपल्यानंतर त्यांच्याकडेही इतर काम शोधण्या शिवाय पर्याय नसतो. सध्या श्रीवर्धनमध्ये मच्छी महाग असली तरी चांगल्या प्रमाणात उपलब्ध होत असल्याने, पर्यटक आल्यानंतर त्यांना मच्छी खाण्याचा आनंद निश्चितपणे लुटता येईल. त्याचप्रमाणे आमरस पुरी, ओल्या काजूगरांची भाजी याचा आस्वाद सुद्धा खवय्यांना घेता येणार आहे. श्रीवर्धन, दिवेआगर येथे येणार्या पर्यटकांना आता विविध वॉटर स्पोर्ट्सचा देखील अनुभव घेता येणार आहे. त्याचबरोबर घोडा सवारी, घोडा गाडीची सवारी, सेंड बाईक, उंट सवारी इत्यादी पर्याय देखील उपलब्ध असणार आहेत. एप्रिल महिन्यापासून सुट्ट्यांचा मौसम सुरू होत असल्याने तालुक्यात पुन्हा एकदा पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतील व पर्यटन व्यवसाय बहरेल असा विश्वास पर्यटन व्यवसायिकांमधून व्यक्त केला जात आहे.