माणगावात कलिंगडे, भाजीपाला पिकवण्यासाठी शेतात थाटला संसार
| माणगाव । वार्ताहर ।
कोकणात पारंपारिक भातशेती नंतर अत्याधुनिक पद्धतीने शेतकरी भातशेती करू लागला आहे. त्याचबरोबर एकपिकी शेतीवर अवलंबून न बसता तो दुपिकीकडे वळला आहे. फळत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र कालांतराने शेतकरी नगदी पिकाकडे वळला जात आहे. ही शेती निसर्गावर पूर्णता अवलंबून आहे. जागतीक तापमानामुळे निसर्गही दिवसेंदिवस बदलत आहे. या बदलाचा फटका शेतीला बसत असून शेतकरी वेळोवेळी संकटात येत आहे. शेती परवडत नसल्याने अनेक शेतकरी शेती पिकविण्याकडे पाठ फिरवत आहेत. त्यातच विविध प्रकल्पामुळे शेतीवर संक्रात आली आहे. परतीच्या पावसाने जिल्ह्यात थैमान घालून भातपिकाचे प्रचंड प्रमणात नुकसान केले. या नुकसानीची कसलीही भरपाई शेतकर्याला मिळाली नाही. मात्र शेतकरी पूर्णता उध्वस्त झाला. वर्षभर कुटुंबाने खायचे काय? हा प्रश्न सतावत असतानाच पुन्हा तो कसाबसा सावरत आपल्या शेतात कलिंगड व भाजीपाला लागवडीसाठी आपले दुख: बाजूला ठेवून कर्जाचा डोंगर घेऊन कुटुंबासह शेतातच आपला संसार थाटला आहे. शेतकर्यांसाठी लढणार्या स्वराज्य सामाजिक संघटनेचे पंकज तांबे यांनी शेतकर्यांच्या बांधावर जावून प्रोत्साहन दिले. यावेळी शेतकरी मुकुंद वाढवळ, स्वप्नील शिर्के, संभाजी गायकवाड आदि उपस्थित होते.
पावसाळ्यानंतर जमिनीच्या मशागतीला सुरुवात केली असून त्यांनी आपल्या शेतात गोल्डन सिड बियाणे 18000 रुपये किलो दराने 52 हजार रुपये किमतीचे आणून 62 हजार कलिंगडाची रोपे नर्सरीत तयार केली आहेत. ही रोपे 20 दिवसानंतर लावणीसाठी तयार झाली असून 15 एकर जमिनीवर ड्रीप मनिंगबेड वर लावली जाणार आहेत. यासाठी सुमारे 1 लाख रुपये खर्च मशागतीसाठी तर 100 गोण खत लागणार असून 2 लाख रुपये खर्च येणार आहे. मजुरीसाठी दीड लाख रुपये औषध फवारणीसाठी 20 हजार पाणी, डीजेलसाठी 25 रुपये खर्च शेतकर्याला येतो. तीन महिन्याचे कलिंगडाचे पिक असून जानेवारी अखेरपर्यंत हे पिक विक्रीसाठी बाजारात पाठवले जाते. निसर्गाने साथ दिली तर थोडाफार नफा मिळतो अन्यथा कर्ज बाजारी होण्याची वेळ येते. तसेच कारले 35 हजार रुपयाचे बियाणे आणले असून मांडव, मशागत, खते, औषधे, मजुरी असे सुमारे साडे तीन लाख रुपये खर्च येत असून जगाचा पोशिंदा पुन्हा एकदा आपल्या शेतात हिमतीने शेती पिकविण्यासाठी उतरला आहे. याचे मात्र सर्वत्र कौतुक होत आहे.
यंदाचे वर्षी कलिंगड 500 हेक्टर, भाजीपाला 458 हेक्टर, कडधान्ये 1106 हेक्टरवर लागवड शेतकर्यांनी केली असून अन्य शेतकर्यांनीही या पिकाकडे वळावे.
रविंद्र पवार
तालुका कृषी अधिकारी