सरपंच प्रमिला बोराडे इशारा
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील हालिवली आणि किरवली गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या कर्जत-पनवेल रेल्वे मार्गासाठी मोठ्या प्रमाणात सुरुंग करण्यात आहेत. त्यामुळे मे महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून झाले आहेत. मात्र, अद्याप कोणालाही आर्थिक मदत रेल्वेकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे नुकसान भरपाई मिळणार नसेल तर आम्ही उपोषणाला बसू, असा इशारा हालिवली ग्रामपंचायच्या सरपंच प्रमिला सुरेश बोराडे यांनी दिला आहे.तशा आशयाचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेऊन हालीवली ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच प्रमिला सुरेश बोराडे यांनी 8 मे 2023 रोजी तातडीची आमसभा घेऊन होणाऱ्या नुकसानीचे व पुढील गावावर येणाऱ्या दुर्घटनेबाबत चर्चा केली होती. तर ब्लास्टिंगचे कामामुळे भूगर्भात बदल घडून डोंगर खिळखिळा होत असून, दरड कोसळून आदिवासी वाडीला धोका असल्याचे आढळून आले होते. ब्लास्टिंगमुळे गावातील अनेक कूपनलिका यांचे पाणी देखील संपुष्टात येऊन पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनाद्वारे कर्जत तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांच्याकडे टाकणार केली होती. यावर कुठलीच ठोस कार्यवाही अद्यापपर्यंत न झाल्याने अखेर सरपंच प्रमिला सुरेश बोराडे या आक्रमक होत, ग्रामस्थांच्या सहकार्याने रेल्वे बोगद्यात होणारे ठेकेदाराचे ब्लास्टिंगचे काम बंद पाडले होते.
कर्जत तहसीलदार यांनी एक महिन्यापूर्वी अर्धवट झालेले पंचनामे व नुकसान भरपाई व आदिवासी वाडीला इर्शाळवाडीसारखे भूस्खलन होऊन दरड कोसळून मानवी दुर्घटना होण्यापासून जोपर्यंत संरक्षण देत नाही, तोवर रेल्वे बोगद्याचे काम होऊ देणार नाही, असा पवित्र घेतला आहे. ब्लॉस्टींगच्या धक्क्यामुळे घराला, अंगणवाडीला तडे गेल्याचे दिसून येत आहे, गावातल्या अनेक बोअरवेलचे पाणी गेले आहे, अर्धवट झालेले पंचनामे पूर्ण करून तहसीलदारांनी स्वतः येऊन याची पाहणी करून योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा या आपल्या ढोबळ कारभाराविरोधात हालिवली ग्रामपंचायत थेट संरपच व ग्रामस्थ उपोषणास बसतील, असा इशारा सरपंच प्रमिला बोराडे यांनी कर्जत तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांना निवेदन देऊन केला आहे.