आरोपींना अटक करण्याची कुणाल पाटील यांची मागणी
| उरण | वार्ताहर |
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली व संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली. ही घटना ताजी असतानाच रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील पागोटे येथे एक पुन्हा एकदा तशीच पुनरावृत्ती घडली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती पागोटे येथे झाल्याने पुन्हा एकदा जनतेच्या सेवेसाठी चोवीस तास उपलब्ध असलेल्या सरपंचाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पागोटे गावचे सरपंच कुणाल अरुण पाटील वय 28, धंदा व्यवसाय, राहणार पागोटे, पोस्ट जेएनपीटी, तालुका उरण, जिल्हा रायगड हे पागोटे गावात त्यांच्या कुटुंबासह राहतात. ते सरपंच असून त्यांचे मे. एक्सप्रेस लॉजिस्टिक नावाने कंपनी कार्यरत आहे. सरपंच कुणाल पाटील हे अनेक वर्षे गावात व गावच्या आजूबाजूच्या परिसरात समाजप्रबोधनाची कामे करतात. व्यावसायिक कामे, शिवसेना शाखेची कामे व समाजप्रबोधनाची कामे हे नवघर कुंडेगाव रस्त्यावर ता. उरण, जिल्हा रायगड येथील कंटेनर केबिनच्या ऑफिसमधून करीत असतात. दिनांक 9/10/2024 रोजी दुपारी 3 वाजताचे सुमारास सरपंच कुणाल पाटील हे कुंडेगाव नवघर रस्त्याच्या बाजूला असलेल्या कंटेनर ऑफिसमध्ये काम करीत असताना काही इसम आरडाओरड करत ऑफिसच्या बाहेर आले. त्यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करत, धमकी देत सरपंच कुणाल पाटील व त्यांच्या दोन साथीदारांवर जीवघेणा हल्ला केला. जीवे ठार मारण्यासाठी आलेल्या इसमांनी लाथाबुक्क्यानी मारहाण केली. बंदुक व तलवारही त्यांनी सोबत आणली होती. मात्र सिसिटीव्ही कॅमेरा असल्यामुळे सदर इसमानी आपली हत्यारे लपविली. सिसिटीव्ही कॅमेरे पाहताच आरोपीनी तेथून लगेच पळ काढला. प्रसंगावधान राखत स्वतःचा बचाव करत सरपंच कुणाल पाटील व त्यांच्या साथीदारांनी स्वतःचा जीव वाचविला. मात्र या सर्व घडामोडी लक्षात घेता महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच खून प्रकरणाची जीवघेणा हल्ल्याची पुनरावृत्ती उरण तालुक्यातील पागोटे गावात झाल्याने सरपंच पदावर काम करणार्या व्यक्तींची सुरक्षितता पुन्हा एकदा धोक्यात आली आहे. पोलीस प्रशासन व महाराष्ट्र शासनाचे सरपंचांच्या अशा घटनेकडे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा पुन्हा असे प्रकार होत असल्याने पोलीस प्रशासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या भूमिकेवर आता पुन्हा एकदा संशय निर्माण झाला आहे.
या संदर्भात सरपंच कुणाल पाटील यांच्या जीवितेला धोका निर्माण झाला असून स्वतःच्या सुरक्षेसाठी व हत्त्या करण्यासाठी आलेल्या संबंधित इसमावर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना अटक व्हावी या उद्देशाने पागोटे ग्रामपंचायतचे सरपंच कुणाल पाटील यांनी पागोटे येथे पत्रकार परिषद घेतली व पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांच्यावर झालेल्या जीवघेणा हल्ल्याबाबत माहिती दिली. व ज्या इसमानी, गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला त्या सर्वांवर कठोरात कठोर कारवाई करून त्वरित अटक करावी अशी मागणी केली.
