देहेन पुलाच्या कामामुळेही ग्रामस्थांमध्ये भीती
प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, ग्रामस्थांची मागणी
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील भाकरवड गावावर संभाव्य पुराचे संकट ओढवण्याची भीती निर्माण झाली असून, गेल इंडिया कंपनीच्या सुरू असलेल्या सबस्टेशन प्रकल्पामुळे पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच देहेन गावाजवळ सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामामुळेही भविष्यात मोठ्या प्रमाणावर जलसंकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
भाकरवड ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष शंकर बाळू पाटील यांनी यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रार अर्ज सादर केला होता. त्या अनुषंगाने महसूल विभागाने 5 जून 2026 रोजी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. पाहणीदरम्यान भाकरवड येथे गेल कंपनीचे सबस्टेशनचे बांधकाम सुरू असल्याचे निदर्शनास आले.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ज्या ठिकाणी सबस्टेशन उभारले जात आहे, त्या परिसरातून अनेक वर्षांपासून पावसाचे पाणी नैसर्गिकरित्या वाहून जात होते. मात्र, प्रकल्पाच्या कामामुळे हा प्रवाह बदलण्यात येत असून त्यामुळे मुसळधार पावसाच्या काळात पाणी गावात घुसण्याची आणि पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. विशेषतः गावातील रस्त्यावर पाणी साचल्यास संपर्क व्यवस्था खंडित होऊन नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
स्थळ पाहणीवेळी गेल कंपनीचे संपर्क अधिकारी काणेकर यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यांनी सबस्टेशनचा आराखडा प्रशासनाकडे सादर केला असला तरी ग्रामस्थांच्या शंका आणि संभाव्य धोक्याबाबत अद्याप समाधानकारक उपाययोजना झालेल्या नसल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, याच मार्गावरील देहेन गावाजवळील जुना पूल मोडकळीस आल्याने नव्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, जुन्या पुलामध्ये चार गाळे (वॉटर ओपनिंग) असताना नव्या पुलात केवळ तीन गाळे ठेवण्याचा प्रस्ताव आहे. सागरगड माची परिसरातून मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी खाली येते. त्यात भरतीच्या काळात नदीचे पाणीही वाढल्यास पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होऊन गाव आणि शेती क्षेत्रात पाणी शिरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित यंत्रणांना तातडीने तांत्रिक पाहणी करून आवश्यक त्या सुधारणा करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात उद्भवणाऱ्या पूरस्थितीची संपूर्ण जबाबदारी संबंधित यंत्रणांवर राहील, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.
‘विकासाच्या नावाखाली गावाला पुराच्या विळख्यात ढकलू नका’
भाकरवड आणि देहेन परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला साकडे घालत, विकासकामे आवश्यक असली तरी त्यातून गाव, शेती आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड होऊ नये, अशी ठाम भूमिका घेतली आहे. आता प्रशासन आणि संबंधित विभाग या गंभीर इशाऱ्याची कितपत दखल घेतात, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.






