| उरण | वार्ताहर |
उरण शहरातील अनेक इमारतींचे बांधकाम जीर्ण झाले आहे. त्यामुळे मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये कोणीही रहिवासी वास्तव्य करु नये यासाठी प्रत्येक इमारतींना उरण नगरपरिषदेने नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे या इमारतींमध्ये कोणीही राहात नाही. मात्र, सदर इमारतीचा काही भाग रहदारीच्या रस्त्यावर कोसळला तर नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती प्रवासी, नागरिक व्यक्त करीत आहेत.
उरण शहरात सुमारे 72 इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. अशा इमारतींना नगरपरिषदेने नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, मोडकळीस आलेल्या इमारतींचा काही भाग हा रहिवाशांच्या रहदारीच्या रस्त्यावर कोसळण्याच्या स्थितीत आहे. एकंदरीत, गजबजलेल्या रस्त्यावर सदर इमारतींचा भाग कोसळला, तर प्रवासी नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. तरी, नगरपरिषदेने जीवितहानी टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नरेश भोईर यांनी केली आहे.