गेले 6 महिने भेटले नाही कमिशन
अनुदानाच्या कारणावरुन गळचेपी होत असल्याचा आरोप
। चिपळूण । प्रतिनिधी ।
रत्नागिरी जिल्ह्यातील रास्तधान्य विक्रेते सध्या आर्थिक चणचणींना तोंड देत आहेत. कारण गेल्या दीड वर्षापासून कोणताही खंड पडू न देता मोफत धान्याचे वेळेत वाटप करून शिधापत्रिकाधारकांची सोय करणारे रास्तधान्य दुकानदारांना गेले 6 महिने त्यांच्या हक्काचे कमिशन मिळाले नाही.
याबाबत प्रशासनाकडे विचारणा केली असता, संबंधित अधिकारी अनुदान नसल्याचे कारण पुढे करत आहेत. यामुळे आमची गळचेपी करण्यात येत असल्याचा आरोप राशन विक्रेत्यांनी केला आहे.
जनसामान्यांना रास्त दरात अन्नधान्य उपलब्ध यावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून शासनमान्य रास्तधान्य दुकानांमधून तांदूळ, गहू, साखर, रॉकेल, डाळी याचे उपलब्धेनुसार वाटप केले जाते. सध्या शासनच हे धान्य दुकानांपर्यंत पोच करीत असून, त्याचे वाटप दुकानदार करीत आहेत.
या कामासाठी शासनाकडून या विक्रेत्यांना कमिशन देण्यात येते. या कमिशनमधून दुकानदार धान्यवाटप व पास मशिनवर अंगठे व अन्य प्रक्रिया करण्यासाठी ठेवलेले कामगार यांचा पगार देऊन उरलेल्या पैशातून आपला उदनिर्वाह चालवतात.
सध्या धान्य वाटपाचा कारभार ऑनलाईन आहे. मात्र, असे असताना याच दुकानदारांना त्यांचे हक्काचे कमिशन वेळेत मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी मे व जून महिन्याचे कमिशन खात्यात जमा झाले असून, जुलै महिन्यापासून डिसेंबरपर्यंतचे कमिशन बाकी आहे.
याबाबत दुकानदारांनी अधिकार्यांना विचारल्यास अनुदान नाही असे उत्तर दिले जात आहे. त्यामुळे कामगारांचा पगार, दुकानाचे भाडे, लाईटबिल व अन्य खर्च भागवायचा कसा? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
दरमहा कमिशन मिळावे
सध्याची परिस्थिती पाहता दुकाने चालवणे सोपे राहिलेले नाही. त्यामुळे दुकानदारांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन त्यांना दरमहा कमिशन दिले जावे. यासाठी पुरवठा विभागाच्या अधिकार्यांनी दुकानदारांच्या समस्या शासनापर्यंत नेण्याची गरज आहे.
अशोक कदम, जिल्हाध्यक्ष, रास्त धान्य दुकानदार संघटना.