सफाई कामगारांच्या मुलांना आर्थिक आधार

वर्षाला मिळणार तीन हजारांची शिष्यवृत्ती
समाजकल्याण विभागाची योजना

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

ग्रामीण भागासह शहरी भागात सफाई कामगार म्हणून काम करणार्‍या कामगारांच्या पहिली ते दहावीमध्ये शिक्षण घेणार्‍या मुलांना वर्षाला तीन हजार रुपयांप्रमाणे शिष्यवृत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून केली जात आहे. या योजनेसाठी 40 प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यामुळे ही योजना सफाई कामगाराच्या मुलांना आर्थिक आधार ठरत आहे.
रायगड जिल्ह्यात 809 ग्रामपंचायती, एक महानगरपालिका, 11 नगरपरिषदा, सहा नगरपंचायत, एक जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, 15 पंचायत समिती, जिल्हा परिषद अशी अनेक सरकारी कार्यालये आहेत. या कार्यालयांतर्गत सुमारे एक हजार कर्मचारी सफाई कामगार म्हणून काम करीत आहेत. सफाई कामगारांना उत्पन्न अत्यल्प असल्याने त्यांना त्यांच्या मुलांना शिक्षण देताना आर्थिक अडचणी निर्माण होतात. अनेक वेळा मुलांना अर्धवट शिक्षण सोडून कुठेतरी काम करावे लागते. सफाई कामगारांची मुले शिकली पाहिजे हा उद्देश समोर ठेवून रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सफाई कामगारांच्या मुलांसाठी दर महिन्याला शिष्यवृत्ती स्वरुपात आर्थिक मदत केली जाते. दर वर्षाला सुमारे तीन हजार रुपयांची ही मदत मुलांना केली जाते. सफाई कामगारांना आर्थिक उभारी देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यातून आलेल्या प्रस्तावाची यादी शासनाला पाठवून त्यांच्याकडून निधी आल्यावर विद्यार्थ्यांच्या खात्यात तो निधी वर्ग केला जातो.
त्यासाठी सफाई कामगार काम करीत असलेल्या वेगवेगळ्या कार्यालयातील सक्षम अधिकार्‍यांचा दाखला जिल्हा परिषदेकडून मागविला जातो. सफाई कामगारांच्या मुलांना या योजनेचा फायदा चांगला होत असल्याने त्यांच्यासाठी ही योजना एक आर्थिक आधार ठरत आहे. जिल्ह्यातील 40 सफाई कामगारांच्या मुलांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे यंदा दाखल झाले आहेत. त्यापैकी 27 मुलांच्या थेट बँक खात्यात तीन हजार रुपये प्रमाणे एक लाख 20 रुपये जमा केल्याची माहिती जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून देण्यात आली आहे.

योजनेला अल्प प्रतिसाद

जिल्ह्यातील वेगवेगळ्या सरकारी कार्यालयात सफाई कामगार काम करीत आहेत. एक हजार पेक्षा अधिक या कार्यालयांमध्ये हे कर्मचारी जिवाची पर्वा न करता काम करीत आहेत. नालेसफाईपासून परिसराची स्वच्छता ठेवण्याचे कर्मचारी करतात. परंतु, या कर्मचार्‍यांपर्यंत योजनेचा प्रचार होत नसल्याने जिल्ह्यातून या योजनेसाठी अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आकडेवारीनुसार, दिसून येत आहे. जिल्ह्यात वेगवेगळ्या सरकारी कार्यालयात काम करणार्‍या सफाई कामगारांपैकी फक्त बोटावर मोजण्याइतक्याच कामगारांच्या मुलांचे प्रस्ताव दाखल झाल्याने या योजनेला खूपच कमी प्रतिसाद मिळत आहे.

पूर्ण वेळ अधिकार्‍याची प्रतीक्षा

समाजकल्याण विभागाचे समाजकल्याण अधिकारी गजानन लेंडी यांची बदली श्रीवर्धन येथे गटविकास अधिकारी म्हणून झाली आहे. त्यांच्या जागी नवीन अधिकारी न आल्याने जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी पद गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहे. त्यामुळे त्या जागेवर महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलीक सध्या काम पाहात आहेत.

Exit mobile version