शॉर्टसर्किटमुळे शेताला आग

कडधान्य जाळून खाक

| पाली | वार्ताहर |

शॉर्टसर्किटमुळे शेताला लागलेल्या आगीत सुधागड तालुक्यातील सिद्धेश्‍वर ब्रु. येथील शेतकर्‍याचे कडधान्य जळून खाक झाले आहे. ही घटना मंगळवारी (दि.28) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. उन्हाच्या तडाख्यात शेतातील विजेच्या खांबावरुन गेलेला विद्युत तारांची स्पार्किंग झाल्याने पेटते गोळे शेतात पडले. त्यामुळे ही आग लागल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. यामुळे शेतातील वालाचे पीक पूर्णतः आगीच्या विळख्यात जाऊन शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाल्याने ते हवालदिल झाले आहेत.

दरम्यान, पिकांच्या नुकसानीची माहिती कृषी अधिकारी, तलाठी, महावितरण यांना कळविण्यात आल्यानंतर सिद्धेश्‍वर ब्रु. तलाठी, कृषी सहाय्यक कंटाले यांनी पाहणी केली. मात्र, पंचनामा करण्यात आलेला नाही. यामुळे शेतकरी हताश झाले आहेत. तरी, तात्काळ पंचनामे करुन आम्हाला नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी बाळू दुर्गे, अनंता गायकवाड, स्मिता गुप्ते यांनी संबंधित विभागाकडे केली आहे.

Exit mobile version