खड्यात वृक्षारोपण
| रसायनी । वार्ताहर ।
रसायनी पाताळगंगा या औदयोगिक क्षेत्राला जोडणारा दांड-रसायनी हा मुख्य रस्ता आहे. परिसरातील वाढती लोकसंख्या, रोजची रहदारी औदयोगिक क्षेत्राकडे येणार्या -जाणार्या वाहनांची वर्दळ पाहता रस्ता नादुरूस्त असल्याने अपघातांना आमंत्रण मिळत आहे. या रस्त्यावरील रीस, मोहोपाडा या तीन किमीचा रस्ता समस्याग्रस्त असल्याने शिवाय रस्त्यालगतच्या दोन्ही बाजुकडील रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य आहे. रस्त्यावरील खड्डे चुकवितांना अपघातांना आमंत्रण मिळत आहे.
दरम्यान दांड रसायनी रस्त्याची दुरवस्थासंबंधी शेकाप, राष्ट्रवादी, कॉग्रेस, शिवसेना, सम्यक सामाजिक संस्था, खालापूर तालुका पत्रकार संघ व इतर सेवाभावी संस्था यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रुपाली पाटील यांच्याशी पत्रव्यवहार केला. परंतू दुर्लक्ष होत असल्याने रसायनीकर रस्त्यावर उतरले. यासाठी बुधवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने खड्यांमध्ये झाडे लावून बांधकाम विभागाचा निषेध करण्यात आला. तर गुरुवार दि.25 रोजी दुपारी कॉग्रेस कृष्णा पारंगे, निखिल डवले,शिवसेनेचे रमेश पाटील, सुरेश म्हात्रे, अजित सावंत मनसेचे फुलचंद लोंढे, शेकापचे समीर म्हात्रे, मनोज गाढे, सम्यक सामाजिक संस्थेचे प्रकाश गायकवाड, वंचित बहुजन आघाडी, पत्रकार बांधव आदींसह इतर पक्ष व सेवाभावी संस्था यांनी एकत्र येऊन मोहोपाडा प्रवेशद्वाराजवळ जवळपास एक तास दहा मिनिटे रास्तारोको केला.
यावेळी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री माने उपस्थित होते. त्यांनी वरिष्ठ अधिकार्यांशी संपर्क करुन हकिकत सांगितली. रस्त्यासाठी जनतेचा उद्रेक पाहून सार्वजनिक बांधकाम विभागाचे पदाधिकार्यांनी रस्ता सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.
या रास्तारोकोत माधुरी जांभळे, कांचन पारंगे, कृष्णा पारंगे, निखिल ढवळे, सागर सुखदरे, प्रशांत खाने, गजानन मांडे, संतोष पांगत, केदार शिंदे, दत्तात्रेय खाने, मंगेश पांगत, अजय म्हस्कर,शेकापचे भानूदास जांभळे, श्वेता कांबळे, दिप्ती म्हात्रे आदीसह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते रसायनीकर उपस्थित होते.