भंगार व्यावसायिकांमुळे उरणवासीय त्रस्त

अनेकांना श्‍वसनाचे त्रास, व्यावसायिकांवर कारवाईची मागणी

| उरण | वार्ताहर |

भंगार व्यावसायिकांकडून पेटवल्या जाणार्‍या वायर, टायर यासह इतर विद्युत उपकरणांमुळे उरण शहरात व तालुक्यात धुरांचे लोट पसरत आहेत. रहिवासी भागात तसेच मोकळ्या जागेत चालणार्‍या या प्रकारामुळे अनेकांना श्‍वसनाचे त्रास होऊ लागले आहेत. त्यानंतरही शहरातील व तालुक्यातील प्रदूषणात भर टाकणार्‍या भंगावर व्यावसायिकांवर कारवाई होत नसल्याचे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. काही महिन्यांपूर्वी अनधिकृत भंगार गोदामाला भीषण आग लागण्याची घटना घडूनही शासकीय यंत्रणा याबाबत कोणतीच खबरदारी घेताना दिसत नाही. यावरून शासकीय यंत्रणेला उरणच्या जनतेचे सोयरसुतक नसल्याचे उघड होत आहे.

मागील काही महिन्यांपासून उरणच्या प्रदूषणाची पातळी घसरत चालली आहे. काही दिवसांपूर्वी शहरात ठिकठिकाणी उग्र वास येण्याचे, डोळ्याची जळजळ होण्याचे प्रकार घडले होते.

या भंगार व्यावसायिकांकडून टायर, वायरी तसेच इतर विद्युत उपकरणे जाळून त्यातील धातू मिळवण्यासाठी रबरचे आवरण जाळले जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर व उग्र वास परिसरात पसरत असतो. अशाच प्रकारे उरण शहरातील बोरी नाका, द्रोणागिरी नोड व तालुक्यातील अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्याठिकाणी लोकवस्तीला लागून व मोकळ्या जागेत मोठ्या संख्येने भंगार व्यावसायिकांची दुकाने आहेत. त्यांच्याकडून दिवसभर जमा झालेल्या वायरी, विद्युत उपकरणे पेटवून त्यामधील धातू काढण्याचे काम केले जाते. यासाठी मोठ्या प्रमाणात टायर जाळले जातात. रहिवासी भागात ड्रममध्येच टायर पेटवून हा प्रकार चालतो. त्यामुळे संध्याकाळ होऊ लागताच ठिकठिकाणी नागरिकांना उग्र वासाला व धुराच्या त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागते. त्यात वृद्ध व्यक्ती व लहान मुलांना सर्वाधिक त्रास होत आहे. सततच्या उग्र वास व धुरामुळे काहींना श्‍वसनाचे त्रास देखील होऊ लागले आहेत.

सुस्त प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. भंगार व्यावसायिक टायर व इतर उपकरणे जाळत असल्याने त्याचा धूर रहिवाशी भागावर पसरत आहे. यामुळे अनेकांना ठसक्याचा त्रास होत असून सातत्याने आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत आहे. वेळीच हा प्रकार न थांबल्यास प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.

– राकेश पाटील, सामाजिक कार्यकर्ता
Exit mobile version