। पाली/बेणसे । वार्ताहर ।
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय विकासाचे शिलेदार, मानबिंदू आहेत. त्यांचे विचार व सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व धार्मिक कार्य आजच्या शासन कर्त्यांना प्रेरणादायी आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानाने खंडप्रायः व विविधतने नटलेल्या देशाला एकसंघपने ठेवण्याची किमया केली, असे प्रतिपादन माज़ी आ. धैर्यशील पाटील यांनी केले. संविधान बचावासाठी देशवासियांनी मतभेद विसरून एक संघपणे व्यापक स्वरुपाचा लढा उभारण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
ढोकशेत सुधागड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सव निमित्त आयोजीत अभिवादन सभेत ते बोलत होते. तेे म्हणाले की, भारतात अनेक, जाती, धर्म, परंपरा, वेशभूषा, बोलीभाषा यामध्ये विभिन्नता असूनही देश एकसंघपने नांदत आहे. कोणत्याही एका धर्माला प्राधान्य न देता सर्वांना समान अधिकार देण्यात आले. हेच संविधानाचे ठळक वैशिष्ट्य आहे. ब्रिटिशांनी भारत देश सोडला आणि 15 ऑगस्ट रोजी भारत देश स्वातंत्र्य झाला. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 17 दिवसांत 395 कलमे आणि 8 परिशिष्टे अशी जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेले संविधान भारत देशाला अर्पण केले. आणि 26 जानेवारी 1950 पासून देशात प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 1942/1946 मध्ये मजूर, ऊर्जा,पाटबंधारे मंत्री असताना कामगार, शेतकरी, उद्योजक, स्त्रिया यांच्याविषयी फार मोलाचे कार्य केले. त्यांनी बहुउद्देशीय प्रकल्प देशात उभारून विकासाचा पायंडा पाडला असे ते म्हणाले.
यावेळी परळी सरपंच संदेश कुंभार,नागेश देशमुख, संतोष देशमुख, सुरेश जाधव, सुनील गायकवाड, अनिल जाधव, किरण गायकवाड, सुशील गायकवाड, राहुल गायकवाड, दामोदर जाधव, दिलीप जाधव,राजेश नाना गायकवाड, नारायण जाधव, राहुल सोनावळे, अमित गायकवाड, वसंत केदारी, रामचंद्र मोरे, भागवत गायकवाड, सचिन गायकवाड, रवींद्र जाधव, चेतन भालेराव, प्रवीण गायकवाड, निखिल जाधव, संजय गायकवाड, सेवक जाधव, दीपक गायकवाड, नितीन वाघमारे, प्रकाश आवासकर, आदींसह मान्यवर , ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.