जमीन बळकावणार्या तिघांविरोधात गुन्हा
| पनवेल | वार्ताहर |
वडिलोपार्जित जमिनीवर हक्क सांगून त्यांचे भागधारकांमध्ये अनेक वादविवाद उजेडात येत आहे. पनवेल पोलीस ठाण्यात नुकत्याच नोंदविलेल्या एका फसवणुकीच्या गुन्ह्यात 13 वर्षांपूर्वी जिवंत असलेल्या वडिलांना मृत घोषित करून त्यांचा खोटा वारस दाखला न्यायालयाची दिशाभूल करून बनवून जमीन बळकाविण्याचा प्रकार उजेडात आला आहे.
ठाणे येथील नौपाडा येथे राहणार्या रोहिणी मालपेकर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये त्यांचे वडील नामदेव म्हात्रे हे 4 जुलै 2011 रोजी जिवंत असतानाही त्यांचे नातेवाईक राजेंद्र म्हात्रे, शरद म्हात्रे, सुभद्रा तळकर यांनी नामदेव यांना मृत असल्याचे कागदोपत्री न्यायालयास दर्शवून बनावट वारस दाखला मिळविला. तो बनावट वारस दाखला पनवेल येथील दुय्यम निबंधक कार्यालयात वापरून त्यासंदर्भात खोटे दस्त बनविल्याची तक्रार पोलिसांत रोहिणी यांनी दिली आहे. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करीत आहेत.