| बुलढाणा | प्रतिनिधी |
समुद्धी महामार्ग अनेकदा काही ना काही कारणाने नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. आता या मार्गावरुन वाहन चालकांना टोल न भरता प्रवास करण्याचा आनंद मिळत आहे. टोलनाका कर्मचाऱ्यांनीच आंदोलन पुकारल्यामुळे वाहन चालक विना टोल या मार्गावरुन प्रवास करीत आहेत.
कंपनीला लाखोंची कमाई मिळवून देणाऱ्या टोल कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्या पासून पगारच मिळाला नाही. किमान दिवाळीततरी पगार होईलख् अशी अपेक्षाही फोल ठरली. तसेच त्यांचे पीएफ खाते देखील उघडण्यात आले नाही. प्रारंभी नाका चालविणाऱ्या कंपनीने हे काम दुसऱ्या कंपनीला देऊन टाकले. जेव्हापासून टोलनाका सुरू झाला, तेव्हा पासून कर्मचाऱ्यांना पगार पत्र दिलेले नाही.
यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आज टोल नाका आणि काम बंद आंदोलन केले आहे. चालक टोलचा दांडा बाजूला करून टोल न भरता वाहन नेत आहे. पगार पत्र नसल्यामुळे पी एफ सुद्धा मिळत नाही. दर तीन महिन्याला जर कंपनी बदलत राहीली तर पिएफ कोणती कंपनी देणार ?असा कर्मचाऱ्याचा सवाल आहे. दरम्यान जो पर्यंत पगार व पीएफ मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. सर्व वाहने मोफत सोडत राहणार अशी भूमिका घेतली आहे.