| अलिबाग | शहर प्रतिनिधी |
तालुक्यातील अलिबाग-रेवदंडा मार्गावर सलग लागलेल्या दिवाळीच्या सुट्ट्या, त्यातच भाऊबीज आणि पर्यटकांची उसळलेली गर्दी यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीशी सामना करावा लागला. त्यातच भाऊबीजेसाठी बाहेर पडलेले नागरीक व दिवाळीच्या सुट्टीसाठी पर्यटकांची गर्दी यामुळे मार्गावर तासन्तास प्रवाशांची रखडपट्टी झाली होती.
दिवाळीची सुट्टी असल्याने अलिबाग, नागांव तसेच पुढे रेवदंडा आणि मुरूड याठीकाणी पर्यटन वाढले असून, मुंबई, पुणे व इतर जिल्ह्यातून पर्यटक मोठ्या प्रमाणात उसळले आहेत. अलिबाग-रेवदंडा मार्गावरील कुरूळ गावानजीक वाहतूक कोंडीवर यांचा ताण पडत आहे. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या नेहमीच उद्भवत आहे. अलिबाग भ्रमंती नंतर पर्यटकांचे लोंढे परतीला निघाले आहेत. मार्गावर दोन्ही बाजूंनी अलिबाग बायपास ते बेलकडे फाटा पर्यंत रांगा लागल्या होत्या. त्यामुळे नागरीकांची व पर्यटाकांची चांगलीच दमछाक झाली. पर्यटक परतीच्या प्रवासाला निघाल्यामुळे वाहतूक कोंडीचा त्रास त्यातच बेलकडे फाट्या जवळ दोन पर्यटकांची समोरा समोर वाहने आल्याने दोघांच्यात थोठी बाचाबाची झाली. यामुळे वाहतुक कोंडीत अजुनच भर पडली. मात्र, याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागला.