तलाठी संघाच्या आंदोलनावर जनतेचा संताप; लाचखोरीच्या आरोपांनी बदनाम अधिकाऱ्याच्या बचावासाठी जनता वेठीस
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक झालेले शहापूरचे मंडळ अधिकारी रविदास जाधव यांच्या समर्थनार्थ रायगड जिल्हा तलाठी संघाने पुकारलेले कामबंद आंदोलन संतापजनक असल्याची तीव्र प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहे. जनतेची सेवा करण्यासाठी पगार घेणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांनी एका अधिकाऱ्याच्या अटकेच्या निषेधार्थ संपूर्ण महसूल व्यवस्था ठप्प करण्याचा निर्णय घेतल्याने ही सरकारी कर्मचाऱ्यांची संघटना आहे की भ्रष्ट अधिकाऱ्यांची संरक्षण समिती? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
पोयनाड पोलिसांनी जमिनीच्या व्यवहारातील फसवणुकीच्या गुन्ह्यात रविदास जाधव यांना अटक केली. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना त्यांच्या समर्थनासाठी तलाठी संघाने कामबंद आंदोलन छेडले असून, 27 जुलैपासून बेमुदत संपाचा इशाराही दिला आहे. मात्र, कायद्याच्या चौकटीत झालेल्या कारवाईविरोधात सरकारी कर्मचारीच रस्त्यावर उतरत असतील, तर कायद्याचा धाक उरणार कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे, संबंधित अधिकाऱ्यावर यापूर्वीही लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले असल्याची चर्चा असताना, अशा अधिकाऱ्याच्या बचावासाठी संपूर्ण महसूल यंत्रणा कामबंद करत असेल, तर तो भ्रष्टाचाराला उघड पाठिंबा असल्याचे चित्र निर्माण होत आहे. या आंदोलनाचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. सातबारा, फेरफार, वारस नोंदी, जात, उत्पन्न, निवासी दाखले यांसारख्या अत्यावश्यक सेवांसाठी शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार आणि नागरिकांना सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. एका अधिकाऱ्याच्या समर्थनासाठी लाखो नागरिकांना वेठीस धरण्याचा अधिकार तलाठी संघाला कोणी दिला? असा संतप्त प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
कायद्याने गुन्हा दाखल केला, पोलीस तपास करत आहेत आणि न्यायालय निर्णय देणार आहे. अशा वेळी आंदोलनाच्या माध्यमातून तपास यंत्रणांवर दबाव आणण्याचा प्रयत्न हा लोकशाही व्यवस्थेला न शोभणारा असल्याची टीका सर्व स्तरातून होत आहे. दोषी अथवा निर्दोष हे न्यायालय ठरवेल; परंतु त्याआधीच संघटनांनी संरक्षण कवच बनणे, ही चिंताजनक बाब असल्याचे मत व्यक्त होत आहे.
जनतेने जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला आवाहन केले आहे की, कोणत्याही संघटनात्मक दबावाला बळी न पडता प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी. तसेच जनतेला वेठीस धरणारे कामबंद आंदोलन तातडीने संपुष्टात आणून महसूल विभागाच्या अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू ठेवाव्यात. भ्रष्टाचाराविरोधात भूमिका घेतली नाही, तर उद्या प्रत्येक कारवाईनंतर सरकारी यंत्रणाच संपावर जाईल आणि त्याची किंमत मोजावी फक्त सामान्य जनतेलाच भोगावी लागेल.
निष्पक्ष चौकशीची मागणी
जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, तसेच महसूल विभागाचे कामकाज सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी जनतेतून होत आहे. सरकारी यंत्रणा ही जनतेच्या सेवेसाठी आहे; एखाद्या अधिकाऱ्याच्या वैयक्तिक प्रकरणासाठी सामान्य नागरिकांना वेठीस धरणे कोणत्याही परिस्थितीत योग्य ठरणार नाही, अशी ठाम भावना व्यक्त केली जात आहे.
दोघांचा अटक पुर्व जामीन अर्ज दाखल
विस्तारित शहापूर औद्योगिक जमीन संपादनात मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यातआला आहे. या गुन्ह्यातील आरोपी तलाठी सतिश ढवळे आणि रिना पाटील यांनी अटक पुर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. न्यायालयाच्या सुनावणीनंतर पुढील कारवाई होणार आहे.
मंडळ अधिकाऱ्याला न्यायालयीन कोठडी
जमीन भुसंपादन प्रक्रियेत आणि नुकसान भरपाई वाटपात लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याप्रकरणी मंडळ अधिकारी रविदास जाधव, रितेश पाटील आणि कुमार नारायण बैकर या तिघांना अटक करण्यात आली होती. सोमवारपर्यंत झालेल्या पोलीस कोठडीनंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांकडून उपलब्ध झाली आहे. रविदास जाधव यांच्याविरोधात यापुर्वी पुरवठा निरीक्षक असताना लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती.
तक्रारीनुसार संबंधितांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. न्यायालयानेदेखील ही कारवाई अधिकृत असल्याचे सांगत रविदास जाधव यांच्याविरोधात पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे बेकायदेशीररित्या अटक केल्याचा आरोप खोटा आहे.
रिजवाना नदाफ, पोलीस निरीक्षक
पोयनाड पोलीस ठाणे








