रत्नागिरीत ‘या’ कामासाठी निधी मंजूर

भविष्यातील वादळांचा मुकाबला करणार
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत रत्नागिरी शहरात भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्यासाठी 3 कोटी 84 लाखांहून अधिक निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने घेतला आहे.

निसर्गातील बदलामुळे कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका वाढला आहे. मागील दोन वर्षांत फयान, निसर्ग आणि आता तौकते चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला प्रचंड मोठा तडाखा दिला. चक्रीवादळाच्या तडाख्याने अलिबागपासून सिंधुदुर्गापर्यंतच्या आंबा, नारळ तसेच इतर पिकांचे मोठे नुकसान केले. विजेचे खांब उन्मळून पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आणि कित्येक गावे अनेक दिवसांपासून अंधारात होती. त्यामुळे किनारपट्टीवरील गावांमध्ये भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्याची महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारने आखली आहे.

रत्नागिरीत भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्याचा सुमारे 97 कोटी रुपयांचा पायलट प्रोजेक्ट सुरू झाला आहे. सुमारे 50 किमी लांबीच्या लघुदाबाच्या भूमिगत वाहिन्या टाकण्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.या योजनेसाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत रत्नागिरी शहरात भूमिगत विद्युत वाहिन्यांसाठी 1 कोटी 26 लाख 24 हजार 145 कोटी रु. आणि अन्य एका प्रकल्पासाठी 2 कोटी 58 लाख 65 हजार 974 रुपये अशा प्रकारे 3 कोटी 84 लाख रुपयांहून अधिकचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे.जागतिक बँकेच्या सहाय्याने नॅशनल सायक्लोन रिस्क मिटिगेशन प्रोजेक्टअंतर्गत राज्याच्या किनारपट्टीवरील भागात 397 कोटी 97 लाख रुपयांची कामे सुरू आहेत . या प्रकल्पांतर्गत किनारपट्टीवरील जिह्यांमध्ये भूमिगत विद्युत वाहिन्यांच्या कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे .

Exit mobile version