नागरिकांनी शिस्त पाळण्याची गरज
| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |
अष्टविनायक तीर्थक्षेत्रांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीत कच-याची समस्या गंभीर झाली आहे. घंटागाड्या फिरून देखील काही नागीरक भर वस्तीत रस्त्याच्या कडेला कचरा टाकत आहेत. परिणामी घाण आणि दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पालीतील कचरा समस्येवर मात करण्यासाठी काही वर्षांपूर्वी घंटागाड्या सुरू करण्यात आल्या. सध्या 5 घंटागाड्या कार्यरत आहेत. या घंटागाड्या येथील विविध भागात फिरून दररोज निश्चित वेळेत फिरून कचरा गोळा करतात. आठवड्यातून एकही दिवस सुट्टी घेतली जात नाही. मात्र तरीही अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचर्याचे ढीग पडलेले असतात.
प्रमुख्याने बल्लाळेश्वर नगरकडे जाणारा मार्ग, जिल्हा परिषद शाळा, आदिवासी समाज भवन शेजारी, मधली अळी, राम अळी, आगर अळी, भाग्यश्री प्लाझा समोर आदी ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्यात येतो. घंटागाडी कचरा घेऊन गेल्यानंतर झालेला कचरा काही दुकानदार आणि अनेक नागरिक घरात किंवा सोयटीमध्ये साठवून न ठेवता लागलीच रस्त्यावर टाकतात. तर काहीजण दिवसभर घरी नसल्यास जमा झालेला कचरा रस्त्याच्या कडेला टाकून देतात. परिणामी कचर्याची समस्या जैसे थेच राहते. यामुळे नागरिकांसह भाविकांचे आरोग्य देखिल धोक्यात आले आहे. भटके कुत्रे व जनावरे हा कचरा अस्ताव्यस्त करतात. तसेच गुरे-ढोरे व भटके कुत्रे यातून अन्न शोधण्यासाठी जातात आणि हा सर्व कचरा व घाण रस्त्यावर व बाजुच्या गटारात पडते. आणि गटारे तुंबून आणखी समस्या उद्भवते.
मेहनती सफाई कर्मचारी पाली ग्रामपंचायतीकडे 22 सफाई कर्मचारी आहेत. हे कर्मचारी मेहनत घेऊन आपली जबाबदारी पूर्ण करतात. मात्र रस्त्याच्या कडेला साठलेला कचरा काढतांना त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण येतो. परिणामी सर्वच ठिकाणची साफसफाई वारंवार करणे त्यांना शक्य होत नाही.
योग्य नियोजन व प्रबोधन हवे लोकांना कचरा विलगीकरणाचे महत्व पटवून देणे गरजेचे आहे. तसेच कचरा संकलीत करताना ओला, सुका, घरगुती, घातक, प्लास्टिक, जैववैद्यकीय व इलेक्ट्रॉनिक कचरा असे वर्गीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांचे प्रबोधन होणे आवश्यक. संपुर्ण शहरात घनकचरा व्यवस्थापन व विलगीकरणाचे काम होणे आवश्यक आहे. तरच कचरा कोंडी सुटेल.
घातक कचरा रस्त्याच्या कडेला टाकण्यात येणार्या कचर्यामध्ये दारूच्या व बियरच्या बाटल्या तसेच घरगुती सामान देखील टाकण्यात येते. या फुटलेल्या दारूच्या बाटल्या जनावरे, कुत्रे तसेच माणसांच्या पायाला लागून इजा होण्याची शक्यता आहे.
गटारे व नाले तुंबतात रस्त्याच्या कडेला टाकलेला कचरा प्लास्टिकच्या बॉटल व प्लास्टिक पिशव्या आदी आजूबाजूच्या गटारे व नाल्यांमध्ये जातात. परिणामी या ठिकाणी गटार व नाले तुंबतात आणि दुर्गंधी व रोगराई पसरते. तसेच सफाई कामगारांचे काम देखील वाढते.
सूचना व माहिती फलकांकडे दुर्लक्ष ज्या ज्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जातो त्या ठिकाणी नगरपंचायत च्या माध्यमातून सूचना व माहिती फलक लावण्यात आले आहेत. त्याबरोबरच जे या ठिकाणी कचरा टाकतील त्यांच्यावर कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल हे देखील या फलकांवर नमूद केले आहे. मात्र नागरिक या फलकांकडे दुर्लक्ष करून त्याच्या आजूबाजूलाच कचरा टाकताना दिसत आहेत. काही ठिकाणचे माहिती व सूचनाफलक फाटले देखील आहेत.
पालीत घंटागाडी नियमित फिरत असून सुद्धा काही नागरिक रस्त्यावर आपला कचरा टाकतात. परिणामी आजारांना निमंत्रण देतात. घंटागाडी असताना अशाप्रकारे रस्त्यावर व गटारात कचरा टाकणे योग्य नाही. नगरपंचायतीने नागरिकांना घंटा गाडीचा वापर करण्यासाठी जनजागृती, दंड व नियोजन करावे.
कपिल पाटील,
सामाजिक कार्यकर्ते,
पाली