अंबा नदीच्या पात्रात कचऱ्याचे साम्राज्य

ग्रामपंचायतीच्या बेजबाबदारपणामुळे आरोग्य धोक्यात

| सुधागड-पाली | प्रतिनिधी |

सुधागड तालुक्यातील वऱ्हाड -जांभूळपाडा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जांभूळपाडा परिसरातील अंबा नदीच्या पात्रात सध्या कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, त्यामुळे नदीचे पाणी दूषित होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतीकडून ‘कचरा व्यवस्थापन’ या नावाखाली केवळ बोंबाबोंब सुरू असून, प्रत्यक्षात कोणतीही ठोस व्यवस्था अस्तित्वात नाही. परिणामी, पर्यावरणीय समतोल ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अंबा नदी ही परिसरातील अनेक गावांसाठी पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून नदीच्या काठावर आणि पात्रात घरगुती, प्लास्टिक आणि घनकचरा टाकला जात आहे. ग्रामपंचायतीकडून नियमित साफसफाई, कचरा संकलन किंवा विल्हेवाट लावण्याची कोणतीही यंत्रणा कार्यरत नसल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली असून, नदीचे पाणी गंभीर स्वरूपात दूषित होण्याची शक्यता आहे. पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत चिंता व्यक्त करत अंबा नदीच्या पात्रात टाकण्यात आलेला कचरा पाण्याच्या गुणवत्तेला धोका पोहोचवत असून, पाणीप्रदूषण वाढण्याची शक्यता आहे, असे स्पष्ट केले. कचऱ्यामुळे दुर्गंधी आणि आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

ग्रामपंचायतीकडून ‘कचरा व्यवस्थापन’ या नावाखाली केवळ कागदी योजना राबवली जात असून, प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याची शक्यता आहे. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिस्थितीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून, त्यांनी ग्रामपंचायतीने तातडीने कचरा व्यवस्थापनाची ठोस यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे. वऱ्हाड-जांभूळपाडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या इतर गावांमध्येही कचरा व्यवस्थापनाची स्थिती अत्यंत दयनीय आहे. कोणत्याही प्रकारचे वर्गीकरण, संकलन किंवा पुनर्वापराची प्रक्रिया राबवली जात नसल्यामुळे संपूर्ण परिसरात अस्वच्छता आणि पर्यावरणीय संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. नदीचे प्रदूषण हे केवळ स्थानिक समस्या नसून, दीर्घकालीन परिणाम करणारे संकट ठरू शकते. अंबा नदीचे पाणी शेती, जनावरांचे पाणी आणि काही ठिकाणी पिण्यासाठीही वापरले जाते. त्यामुळे या प्रदूषणाचा थेट परिणाम आरोग्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

साफसफाईची मागणी
प्रशासनाने अंबा नदीच्या काठावर साठलेल्या कचऱ्याची तातडीने साफसफाई करावी, प्रत्येक गावात कचरा संकलनासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी, प्लास्टिक आणि घनकचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी पर्यावरणपूरक उपाययोजना राबवाव्यात आणि या विषयावर ठोस निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी, अशा मागण्या नागरिकांकडून करण्यात आल्या आहेत.
Exit mobile version