प्रवाशांना दुर्गंधीतून काढावा लागतो मार्ग
| उरण । वार्ताहर ।
नवीमुंबईचा घातक कचर्याचे उरण-पनवेल हद्दीतील सिडकोच्या जागांवर मानव निर्मित डोंगर तयार केल्यानंतर रहदारीच्या रस्त्यावर टाकला जात आहे. असाच कचरा आत्ता थेट कचरा गव्हाण फाटा-दिघोडे रस्त्यावरच टाकला जात असल्याने रस्ता धोकादायक बनला असून प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नवी मुंबईचाच भाग म्हणून विकसित होत असलेल्या उरण वाढत्या नागरीकरणामुळे तालुक्यातील कचर्याची समस्या गंभीर झाली आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीना कचराभूमीची जागा नसल्याने ग्रामपंचायतीकडून गावातील कचरा गावा शेजारील रहदारीच्या रस्त्यावर टाकण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांना व विभागातील रस्ते हे गावातील कचर्यानी भरू लागले आहेत. हा कचरा कुजू लागल्याने कचर्यामुळे निर्माण होणार्या दुर्गंधीचा त्रास या मार्गाने प्रवास करणार्या प्रवासी व नागरिकांना नाक मुठीत ठेवून प्रवास करावा लागत आहे.
हजारो टन कचरा (डेब्रिज) हा वहाल ग्रामपंचायत हद्दीतील खाडीकिनार्यावरील खारफुटींवर तसेच खाडीच्या पाण्यात टाकत असल्याने खारफुटीची वने नष्ट होऊन खाडीतील विविध जातींचे मासे संपुष्टात येऊ लागले आहेत. त्यामुळे प्रदुषणात वाढ होऊन मासेमारी करणार्या बांधवांचे उपजिविकेचे साधन संपुष्टात येऊ लागले आहे.
या निर्माण होणार्या कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून भूखंड तर येथील मोठ्या उद्योगांकडून निधी मिळावा अशी मागणी पंचायत समितीच्या वतीने वारंवार करूनही त्याकडे दुर्लक्ष केली जात आहे. त्यामुळे गावागावांतील कचर्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. सध्या उरणचा विकास झपाट्याने होत असतांना कचर्याची समस्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून उरण मधील निर्माण होणार्या कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.