| मुंबई | प्रतिनिधी |
रायगडच्या किनार्यांना मुंबईतील कचर्यांमुळे धोका निर्माण झाल्याचे आ.जयंत पाटील यांनी लक्ष वेधले. या संदर्भात सादर केलेल्या लेखी प्रश्नांत ते म्हणाले की, मुंबईतील हजारो टन कचरा दररोज समुद्रात फेकला जात असून हा कचरा मांडवा, सासवणे, वर्सोली या समुद्रकिनार्यावर वाहत येऊन येतो. त्यात प्लास्टिक कचर्याचे प्रमाण सरासरी 60 टक्के असून अलिबाग समुद्रकिनारी येणार्या पर्यटकांकडूनही परिसरात कचरा टाकला जातो, त्यामुळे सागरी जिवांच्या अन्नसाखळीत बाधा येत असून मत्स्य दुष्काळाचे संकट निर्माण झाले असल्याचे आ. जयंत पाटील यांनी सरकारच्या निदर्शनास आणले.
लेखी उत्तरात शिंदे यांनी कचरा वाहून येत नसल्याचे नमूद केलेले आहे. अलिबाग नगरपालिकेच्यावतीनेही समुद्रकिनारी वाहत आलेला कचरा हा समुद्रकिनारा स्वच्छता मशिनद्वारे संकलित करण्यात येतो. तसेच पर्यटकांकरिता ठिकठिकाणी कचर्याचे डस्टबिन ठेवण्यात आलेले आहे व समुद्रकिनारी स्वच्छता करणेकरीता सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचेद्वारे दररोज कचरा संकलित केला असल्याचे सांगितले आहे, असे शिंदे यांनी लेखी उत्तरात सांगितले.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांनी कळविल्याप्रमाणे ग्रामपंचायतीच्या आर्थिक परिस्थितीनुसार ग्रामपंचायतीमार्फत खाडीलगत येणारा कचरा उचलण्याचा प्रयत्न केला असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या उत्तरातून सांगण्यात आले. मुळ प्रश्नात आ.जयंत पाटील यांनी वाढत्या कचर्यामुळे समुद्रकिनारे विद्रूप होत असून कचर्याचा सर्वाधिक प्रादुर्भाव कांदळवनांमध्ये दिसून येत असल्यामुळे कांदळवनांची जैवविविधता धोक्यात आली आहे, असल्याचे म्हटले आहे.
गतवर्षी आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत दिनांक 3 जुलै ते 17 सप्टेंबर दरम्यान व्यापक स्वरूपात स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा हा उपक्रम राबवण्यात आला होता. त्याचबरोबर विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते ही सातत्याने किनार्यावर स्वच्छता मोहीम राबवितात तरीही किनार्यांवरील कचर्याची समस्या कायम आहे, याबाबत चिंताही व्यक्त केली. कचर्यामुळे होत असलेल्या समुद्रकिनार्यांचे तसेच कांदळवनांचे रक्षण करण्याबाबत तसेच कचर्याची विल्हेवाट लावण्याबाबत कोणती कार्यवाही केली याची माहिती द्यावी, अशी मागणी केली.