नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर
| उरण | प्रतिनिधी |
जागतिक कीर्तीचे पर्यटन स्थळ असलेल्या एलिफंटा बेटावरील तीन गावातील ग्रामस्थ व दररोज येणार्या हजारो पर्यटकांची पिण्याच्या पाण्याची नव्या योजनेमुळे व्यवस्था होणार आहे. यासाठी घारापुरी ग्रामपंचायतीने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत 17 कोटी 59 लाख खर्चाच्या घारापुरी नळ पाणीपुरवठा योजनेला कोअर कमिटीनंतर कॅबिनेट बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे.या महत्वकांक्षी योजनेमुळे बेटावरील तीन गावांचा आणि पर्यटकांचा पुढील 40 वर्षांकरीता (सन- 2054 ) पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.
बेटावरील पाणी समस्या कायमची दूर करण्यासाठी तीनही गावे आणि पर्यटकांसाठी घारापुरी नळ पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव राजिपच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सादर केला होता. 2021 साली सादर केलेल्या प्रस्ताव खर्चाच्या दृष्टिकोनातून राजिपच्या आवाक्याबाहेर होता.पाच कोटींपेक्षा अधिक असलेल्या खर्चामुळे 29 जुन 2022 रोजी राजिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी मंजुरीनंतर घारापुरी नळ पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाकडे पाठविण्यात आला होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळानेही 17 कोटी 59 लाख खर्चाचा अंतिम मंजुरीसाठी मंत्रालयाकडे धाडला होता, अशी माहिती महाराष्ट्र प्राधिकरण महामंडळाचे उप अभियंता नामदेवराव जगताप यांनी दिली.
अशी आहे योजना बेटावरील मोरा बंदर येथील मोठा तलावातील पाण्याचा वापर केला जाणार आहे. यासाठी तलावाची खोली वाढविण्यात येणार आहे. त्याभोवती संरक्षण भिंतीसह फिल्टरेशन प्लाण्ट बसविण्यात येणार आहे.