। महाड । प्रतिनिधी ।
सर्वत्र कोविड-19 ने हाहाकार माजविला असताना आपल्या गावकर्यांस सुरक्षित ठेऊन कोरोनास वेशीवरच रोखण्यात यशस्वी झाल्याबद्दल संपूर्ण रायगड जिल्ह्यात आरोग्य खात्याकडून ग्रामपंचायत घावरेकोंड हिस प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले आहे.तसेच यावेळी गावातील सन 2021 च्या 10 वी आणि 12 वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 12 विद्यार्थ्यांचा प्रशस्ती पत्र, सन्मान चिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन गुणगौरव करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे सदरचा उपक्रम श्रीराम विकास मंडळ मुंबई(रजि) यांनी पुरस्कृत केला होता. यावेळी गावाच्या सरपंच सुनीता सुतार, तंटामुक्ती अध्यक्ष कॅप्टन महिपत शिंदे, राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.तुकाराम महाराज शिंदे, कॅप्टन दिनकर जाधव, उपसरपंच सतीश जाधव, माजी सरपंच जयराम सुतार, मुंबई मंडळाचे अध्यक्ष अशोक शिंदे, उपाध्यक्ष संजय शिंदे, पंचायत समिती महिला मंडळ आणि गाव, मुंबई, पुणे मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते उपस्थित होते.
घावरेकोंड-रामवाडी ठरले जिल्ह्यातील पहिले कोरोनामुक्त गाव
