काँग्रेसला धक्का! गुलाम नबी आझाद यांचा पक्षाला रामराम

। जम्मू काश्मीर । वृत्तसंस्था ।
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. गुलाम नबी आझाद यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. पक्षाचं प्राथमिक सदस्यत्वही त्यांनी सोडलं आहे. 16 ऑगस्टला त्यांनी जम्मू काश्मीर काँग्रेस प्रचार समितीच्या प्रमुखपदाचा राजीनामा देत आपल्या नाराजीचे संकेत दिले होते. त्यानंतर अखेर आता त्यांनी राजीनामा देत पक्षाला मोठा धक्का दिला आहे. गुलान नबी आझाद यांनी अध्यक्षा सोनिया गांधी यांना चार पानांचं पत्र पाठवत राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे.

राहुल गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर आणि खासकरुन जानेवारी 2013 मध्ये त्यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर याआधी असलेली सल्लागार यंत्रणा पूर्णपणे नष्ट करण्यात आली, असा आरोप त्यांनी पत्रात केला आहे. तसंच पक्षाच्या अनुभवी नेत्यांना बाजूला सारुन कोणताही अनुभव नसणारे पक्षाचे कामकाज चालवू लागले, असेही ते म्हणाले आहेत. राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांसमोर सरकारी अध्यादेश फाडला हे फारच बालिशपणाचं होतं अशी टीका करताना 2014 च्या निवडणुकीत झालेल्या पराभवात याचा मोठा वाटा होता, असा दावा त्यांनी केला आहे.

Exit mobile version