गुलाम नबी आझाद यांची काँग्रेस नेतृत्वावर टीका
। श्रीनगर । वृत्तसंस्था ।
एकीकडे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल नेतृत्वावर टीका करण्यात अजिबात मागेपुढे पाहात नसताना आता गुलाम नबी आझाद यांनी देखील विरोधाचा शंख फुंकला आहे. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्त्वात किमान विरोध करण्याची मुभा होती. पण आता ही मुभादेखील प्रस्थापित नेतृत्त्वात राहिली नसल्याची टीका त्यांनी केली आहे.
दोन वर्षांपूर्वी जी-23 नावाचा गट स्थापन करून त्यामध्ये काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी पक्षनेतृत्व आणि पक्षातील कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली होती. तसेच, राहुल गांधींच्या नेतृत्वावर देखील आक्षेप घेतला होता. याच जी-23चे एक सदस्य असलेले जम्मू-काश्मीरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आपल्याच पक्षावर परखड शब्दांत निशाणा साधला आहे.
तसेच, नवा पक्ष स्थापन करण्याचा कोणताही विचार नाही, पण राजकारणात काय होईल, हे कुणीच सांगू शकत नाही, असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे काँग्रेसला आगामी काळात पक्षाच्याच ज्येष्ठ नेत्यांकडून धक्के बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
दरम्यान, गुलाम नबी आझाद यांनी यावेळी बोलताना इंदिरा गांधी-राजीव गांधी आणि काँग्रेसचं आत्ताचं नेतृत्व यांच्यात तुलना केली आहे. नेतृत्वाला कुणीही आव्हान देत नाहीये. इंदिरा गांधी आणि राजीव गांधींनी मला काही चुकीचं घडल्यास त्यावर प्रश्न विचारण्याची मोकळीक दिली होती. त्यांचा टीकेबाबत आक्षेप नसायचा. त्यांना यात अपमान नव्हता वाटत. आज काँग्रेसमध्ये नेतृत्वाला यात अपमान वाटतो, असं गुलाम नबी आझाद पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
याशिवाय, गुलाम नबी आझाद यांनी राजीव गांधी राजकारणात आले, तेव्हाचा एक प्रसंग यावेळी सांगितला. जेव्हा राजीव गांधींनी राजकारणात प्रवेश केला, तेव्हा इंदिरा गांधींनी आम्हाला दोघांना बोलावून घेतलं. त्यांनी राजीव गांधींना सांगितलं, की गुलाम नबी मला देखील नाही म्हणू शकतात. पण तो नाही म्हणजे अपमान नव्हे. तो नकार पक्षाच्या हितासाठी असतो. आज कुणीही तो नकार ऐकायला तयार नाही. आज तुम्ही नाही म्हणालात तर तुमची किंमत शून्य होते, असे आझाद म्हणाले.