। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्यासह अन्य विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कर्मचार्यांचे बंद आंदोलन अद्यापही कायम आहे. त्यामुळे येथील आगाराचा तोटा वाढत चालला आहे. दिवसाला साडेतीन लाख उत्पन्न असलेल्या राजापूर आगाराला बंद कालावधीमध्ये 70 लाखांचे नुकसान झाले आहे.
आंदोलनामध्ये फूट पडून काही कर्मचारी हजर झाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून एसटी आगाराच्या यार्डामध्ये थांबलेल्या एसटीच्या काही फेर्या धावू लागल्याने सर्वसामान्य प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
या बंदमध्ये आगारातील सुमारे 254 कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामध्ये कायम व रोजंदारी कर्मचार्यांचाही समावेश आहे. आगाराबाहेर तंबू ठोकून हे कर्मचारी दिवसभर या संपामध्ये सहभागी झाले आहेत.
दिवसागणिक चिघळणारे बंद आंदोलन थांबविण्यासाठी प्रशासनाकडूनही आक्रमक पवित्रा घेण्यात आला होता. त्यामध्ये येथील आगारातील काही कर्मचार्यांचे निलंबन करण्यात आले असून काही रोजंदारी कर्मचार्यांना सेवा समाप्तीच्या नोटिसाही देण्यात आल्या आहेत. मात्र तरीही त्यांचे आंदोलन सुरूच आहे; मात्र शासनाकडून पगारवाढीचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर आता राज्यातील काही आगारातील कर्मचारी कामावर रूजू होऊ लागले आहेत.
राजापूर आगारातील 71 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. कर्मचारी हजर झाल्यानंतर राजापूर आगारातून तब्बल 17 एसटी बसेस सोडण्यात आल्या. त्यामध्ये राजापूर-हातदे, पाचल-आंबा, बुरंबेवाडी, नाटे, तारळ, हातदे, राजापूर-जांभवली या मार्गांसह रत्नागिरी मार्गावर प्रवाशांना ने-आण करण्यासाठी या फेर्या सोडण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक राजेश पाथरे यांनी दिली.