नदीच्या प्रवाहात अडकलेल्या महिलांना जीवनदान

चार धाडसी मासेमारांचा सत्कार

। पाली । वार्ताहर ।

सुधागड तालुक्यातील करचुंडे गावातील दोन महिला रविवारी (दि.18) सायंकाळी सहाच्या दरम्यान अंबा नदीच्या पाण्याच्या प्रवाहात अडकल्या होत्या. यावेळी येथे मासेमारी करत असलेल्या चार मासेमार्‍यांनी या महिलांना पाहिले आणि जीवाची बाजी लावून त्यांना नदीतून बाहेर काढले.

लता शरद पानसरे व श्‍वेता शेखर पानसरे या दोन महिला परळी येथील आपली दुकाने बंद करून मधल्या रस्त्याने अंबा नदीच्या पात्रातून करचुंडे येथे घरी निघाल्या होत्या. त्यांच्या सोबत मयुरी महेश वझरेकर व सार्थक शेखर पानसरे हेदेखील होते. येथील अंबा नदीचे पाणी कमी असल्याने हे चारही जण नदीतून पलीकडे जाण्यासाठी निघाले होते. मात्र, अचानक नदीचे पाणी वाढले. पाण्याचा प्रवाह वाढताना पाहून मयुरी व सार्थक हे दोघे पाठीमागे फिरून धावत नदीकिनारी पोहोचले. मात्र, लता व श्‍वेता पानसरे या दोघींना पाठीमागे फिरता आले नाही. परिणामी या दोन्ही महिला मध्येच अडकून पडल्या होत्या. यावेळी येथे मासेमारी करत असलेले प्रमोद म्हस्कर, शिवा म्हस्कर, तुकाराम म्हस्क व रवींद्र म्हस्कर यांनी क्षणाचाही विलंब न करता ताबडतोब या महिलांना टायर ट्यूबमध्ये बसून दोर लावून जीवाची बाजी लावून सुखरूप नदीकिनारी आणले. नदीकिनारी असलेल्या लोकांनी दोर खेचून मदत केली. यावेळी हा थरारक प्रसंग पाहण्यासाठी आजूबाजूला शेकडो लोकांनी मोठी गर्दी केली होती. या मासेमारांचा परळी ग्रामस्थांनी रात्री सत्कार केला.

Exit mobile version