हजारो रसायनीकरांचा एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा
| रसायनी | प्रतिनिधी |
रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील बोरीवली या गावाच्या परिसरात प्रस्तावित असलेल्या एसएमएस इन्व्होक्लीन प्रा.लि. या जैववैद्यकीय प्रकल्पाला (बायोमेडिकल वेस्ट) स्थानिकांचा विरोध आहे. प्रकल्प झाला तर आमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल, आम्हाला शुद्धा श्वास घेणेदेखील अवघड होईल. शासन आमच्यावर हा प्रकल्प लादत असल्याचा आरोप रसायनीकरांनी केला आहे. दरम्यान, या प्रकल्पाविरोधात सोमवार, (दि.4) मार्च एमआयडीसी कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक संघटना तसेच परिसरातील अकरा ते बारा हजार स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी एसएमएस इनोव्हाक्लीन प्रा.लि. कंपनी आणि एमआयडीसी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत ‘चले जाव’चा नारा देत, हा प्रकल्प पाताळगंगा परिसरात नको, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
![](http://krushival.in/grygrars/2024/03/IMG-20240304-WA0598-1-1024x615.jpg)
कामगार नेते श्रुती श्याम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली बोरीवली येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. यावेळी कामगार नेते भाई जगताप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली. या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. एसएमएस इनोव्हाक्लीन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि एमआयडीसी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हा मोर्चा बोरीवलीहून रिलायन्समार्गे एमआयसीसी येथे धडकला. यात गोवंडी येथे असणारा हा मानवी जीवास घातक असा प्रकल्प रसायनी पाताळगंगा विभागात नको, असा निर्णय परिसरातील नागरिकांनी घेतला होता. यावेळी अडीच ते तीन किलोमीटरचा रस्ता नागरिकांनी भरगच्च झाला होता. यात प्रत्येक गावागावातील नागरिक मोर्चामध्ये दाखल होत होते. या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी कामगार नेते आ. भाई जगताप, शेतकरी कामागर पक्षाचे सरचिअणीस आ. जयंत पाटील, माजी आ. मनोहर भोईर, माजी आ. सुरेश लाड यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
प्रास्ताविक भाषणात कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांनी सांगितले की, तुम्ही आता रेड झोनमध्ये आहात, ही कंपनी याठिकाणी कशाप्रकारे आली, आम्हाला न्याय हवा आहे, मला फक्त एक स्वच्छ श्वास पाहिजे. जर आम्हाला शुद्ध श्वास घेण्याचा अधिकार नसेल, तर आमचा एक-एक मताधिकार आमच्याकडे आहे, हे जर कंपनी आमच्या छाताडावर बसवून करत असाल, तर याद राखा, ही तर फक्त झाकी आहे, असली जलवा तो अभी बाकी हे.
![](http://krushival.in/grygrars/2024/03/IMG-20240304-WA0594-1-1024x558.jpg)
कुठल्याही परिस्थितीत हा कारखाना होता कामा नये, एकत्र करून नायनाट करू, असे प्रतिपादन माजी आमदार सुरेश लाड यांनी दिले. माजी आमदार मनोहर आपल्या भाषणात म्हणाले की, हा जैविक प्रकल्प रसायनीमध्ये आणून हा जनतेचे सरकार आहे की आणखी कोणाच्या सरकार आहे हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला. हा प्रकल्प इथ येता कामा नये, जनतेला हा प्रकल्प जर मान्य नसेल, हा एसएमएस प्रकल्प प्रकल्प आमदारांनी इथे येता कामा नये यासाठी विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे, असे माजी आमदार मनोहर भोईर यांनी सांगितले.
हा प्रकल्प गोवंडी येथे असल्यामुळे येथील स्थानिकांना त्यांचा त्रास होत असल्यामुळे उच्च न्यायालयाने हा प्रकल्प स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच हा प्रकल्प आत्करगाव येथे येत असल्याचे समजताच येथील जनसुनावणीदरम्यान विरोध दर्शविला. एमआयडीसी व्यवस्थापक व्ही.एस. ठाकूर, उपअभियंता राऊत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघर्ष समितीचे युवक तसेच सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी संघर्ष समितीच्या महिलांनी प्रकल्पाविरोधात घोषणाबाजी करुन जैववैद्यकीय प्रकल्प बोरीवली पाताळगंगातून हद्दपार न झाल्यास रक्तरंजित लढा देण्याचा ठाम निर्णय घेतला. यावेळी उबाठाचे मावळ लोकसभा संघटक संजोग-वाघिरे पाटील यांनी स्थानिकांना अन्याय होत असेल तर आम्हीही रस्त्यावर उतरु असा इशारा दिला. यावेळी बोरीवली संघर्ष समितीतील युवकांसह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांसह मोठ्या सख्येने स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.
जनतेच्या जीवावर उठणारे प्रकल्प कदापि खपवून घेणार नाही- आ. जयंत पाटील
प्रस्तावित जैववैद्यकीय प्रकल्पाला येथील जनतेचा तीव्र विरोध आहे. जनतेच्या जीवावर उठणारे प्रकल्प कायदे मोडून छाताडावर बसविण्याचे काम करणार असाल, तर ते कदापि खपवून घेणार नाही, असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी यावेळी दिला. ते म्हणाले की, या प्रकल्पाच्या जनसुनावणीदरम्यान दोन वेळा मी उपस्थित होतो. येथील जनतेला हा प्रकल्प नको असल्याने तो रद्द करण्यासाठी मी विधिमंडळात आवाज उठवणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.