। कर्जत । प्रतिनिधी ।
माथेरानमधील वन व्यवस्थापन समितीच्या अधिपत्याखाली असलेल्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या तीन गाड्यांचे सायलेंन्सर चोरीला गेल्याची घटना 19 जुलैच्या रात्री घडली. दुसर्याच दिवशी गाडी पाहण्यासाठी आलेल्या मालकांमुळे हा धक्कादायक प्रकार पुढे आला. यामध्ये दोन स्थानिक तर एक गाडी पर्यटकांची आहे.
सविस्तर वृत्त असे की, 20 जुलैला सकाळी नेरळकडे जाण्यासाठी प्रशांत कदम, नरेश आखाडे व पर्यटक चिराग पटेल हे आपली गाडी घेऊन नेरळच्या दिशेने निघण्यासाठी गाडीजवळ गेले असता प्रशांत कदम व नरेश आखाडे या दोघांना गाडीला सायलेंसर नसल्याचे लक्षात आले. तर, कांदिवली, मुंबई येथील पर्यटक हे परिवारासोबत परतीच्या प्रवासाला निघाले, पण गाडी जास्त आवाज का करते म्हणून गाडी थांबून पाहिले तर गाडीला सायलेंसर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेवरुन तीन गाड्यांचे सायलेंसर चोरीला गेल्याची बातमी वाहनतळात वार्यासारखी पसरली. दोघे स्थानिक व पर्यटक हे एकत्र आले आणि पोलीस ठाण्यात जाणार तोच धोंडू कदम यांच्या गाडीचा सायलेंन्सर अर्धवट काढलेला आढळला. या सर्वांनी येथील स्थानिक पोलिसांना हकीकत सांगितली. पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. त्यानुसार गाडी मालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पार्किंगमधील वीज बंद
सध्या पार्किंगमध्ये एमएमआरडीएकडून विकासकामे चालू आहेत. त्यामध्ये पार्किंगमधील वीज जोडणी एमएमआरडीए काढली आहे. त्यामुळे या अंधाराचा फायदा चोरांनी घेतला आणि सायलेन्सर चोरी केली.
सीसीटीव्ही बसविणे गरजेचे
वन व्यवस्थापन समिती ही प्रत्येक गाडीमागे 100 रुपये टॅक्स घेते, पण त्या पर्यटकांच्या गाड्यांची सुरक्षा राम भरोसे आहे. एक सिझनला 500 गाड्या उभ्या राहतात. या गाड्यांचा टॅक्स घेतात, मात्र जे वन व्यवस्थापन समितीच उत्पनाचे स्रोत आहे, त्याच्याकडे लक्ष दिले जात नाही. अनेक वेळा चोरीच्या घटना घडल्या आहेत. असे असताना वन व्यस्थापन समिती सीसीटीव्ही का लावत नाही? सीसीटीव्ही न लावण्यामागे समितीचा हेतू काय? की जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष केले जाते की काय? असे अनेक प्रश्न पर्यटकांकडून उपस्थित होत आहेत.
वन व्यवस्थापन समिती आमच्या गाड्यांचा टॅक्स घेते मग आमच्या गाडीची सुरक्षा का ठेवत नाही. असे जर असेल तर कोण पुन्हा माथेरानला आपली खासगी वाहने घेऊन येणार नाहीत. यावर वन विभागाने लक्ष दिले पाहिजे.
चिराग पटेल, पर्यटक, कांदिवली-मुंबई