| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला यश आले असून, मानधनात दीड हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आपल्या विविध मुंबईतल्या आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांनी ठिय्या आंदोलनाचे हत्यार उपसले होते. तर, काही अंगणवाडी सेविका थेट रायगड किल्ल्यावर पोहोचल्या. या आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेतली असून, अंगणवाडी सेविकांना दिलासा दिला आहे.
दरम्यान, अंगणवाडी सेविकांसोबत राज्य सरकारने सकारात्मक चर्चा केली आहे. अंगणवाडी सेविकांना दीड हजार रुपये मानधन वाढवून मिळणार असून, सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजनाही सुरु केली जाणार आहे. तसेच त्यांना मोबाइल दिले जाणार आहेत. अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नाबाबत तातडीची बैठक घेण्यात आली. सेविकांचे शिष्टमंडळ आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने ही बैठक झाली. या बैठकीत तोडगा काढण्यात सरकारला यश आले आहे.
दरम्यान, मागण्या पूर्ण होईपर्यंत मैदान सोडणार नसल्याचा पवित्रा अंगणवाडी सेविकांनी घेतला होता. राज्य सरकारनं साडेपाच, तर केंद्रानं गेली साडेचार वर्षे मानधनात कुठलीही वाढ दिलेली नाही. यासह अनेक मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या होत्या. त्यानंतर हा प्रश्न विधानसभेतही उपस्थित करण्यात आला.