पाणी योजनेचा विद्युतपुरवठा महावितरणकडून खंडित
थकीत बिलामुळे केली कारवाई
| नेरळ | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यातील आर्थिक आणि लोकसंख्येच्या दृषटिकोनातून मोठी असलेली नेरळ ग्रामपंचायत आता आर्थिक कोंडीत सापडलेल्या अवस्थेत आहे. नुकतेच ग्रामपंचायतीकडे निधी नसल्याने ती नेरळ विकास प्राधिकरणाच्या भरवश्यावर असल्याची लेखी माहिती ग्रामविकास अधिकारी यांनी दिली होती. तर ग्रामपंचायतीने पाणी योजनेचे बिल थकीत ठेवल्याने महावितरणने कारवाई केली आहे. पाणी योजनेचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नेरळ ग्रामपंचायत आता डिझेल भरोसे असल्याचे चित्र आहे. रायगड जिल्ह्यात एकूण 809 ग्रामपंचायती असून, त्यामध्ये 1800 च्यावर महसुली गावांचा समावेश आहे. तर त्यापैकी लोकसंख्या व आर्थिकदृष्ट्या सक्षम म्हणून नेरळ ग्रामपंचायतीचा पहिला नंबर लागतो.
या मोठ्या प्रमाणात नागरिकरण होत असलेल्या ग्रामपंचायत मधील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ने 1998 मध्ये राबवलेली नळपाणी योजना उल्हास नदीवरून पाणी उचलून नेरळ गावात आणण्यात येते. बोर्ले येथे असलेल्या उद्भव केंद्रातून पाणी उचलण्यासाठी वीज वापरली जाते आणि त्या वीज वापराचे देयक काही महिने थकीत आहे. महावितरणकडून सध्या थकीत विद्युत बिलावर मोहीम सुरू आहे. परिणामी, वीज बिलाची थकीत रक्कम वसूल करण्याचा दबाव महावितरण कार्यालयावर आहे. मात्र वेळेत देयक जमा न जमा केल्यामुळे महावितरणने पाणी योजनेचा विद्युत पुरवठा शुक्रवार, दि.28 रोजी दुपारी खंडित केला आहे. तर नेरळमध्ये पाणीबाणी उद्भवू नये म्हणून ग्रामपंचायतने आता जनरेटरचा आधार घेतला आहे. तर, दिवसाकाठी 70 ते हजारांच्या डिझेलचा भार ग्रामपंचायतीवर पडत आहे. तसेच जनरेटर सुस्थितीत नसल्याने शनिवारी शहरामध्ये पाण्यासाठी बोंबाबोंब झाली होती. मात्र, तत्काळ जनरेटरचे काम मार्गी लावण्यात आले. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत झाला.
दरम्यान ग्रामपंचायत नेरळची आर्थिक स्थिती खालावली असल्याचे खुद्द ग्रामविकास अधिकारी यांनी लेखी माहितीत सांगितले होते. त्यामुळे नेरळचा विकास आता नेरळ विकास संकुल यांच्या भरवशावर आहे. त्यामुळे लवकरात लवकर विद्युत देयक अदा न केल्यास नेरळ शहरात पाणीबाणी उद्भवण्याची चिन्हे गडद आहेत. त्यामुळे आता ग्रामपंचायत काय पावले उचलते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नेरळ ग्रामपंचायतीवर पाणी योजनेचे मोठे बिल शिल्लक होते. आमच्या काळात आम्ही ते कमी करत आणले आहे. मात्र तरीही दर त्यात 8 लाखांची भर पडत असते. तसेच व्याज देखील वाढत असते. आता साधारण 27 ते 28 लाखांच्या आसपास देयक शिल्लक असेल. तसेच महावितरणच्या अधिकार्यांशी बोलून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. – उषा पारधी, सरपंच नेरळ ग्रामपंचायत
नेरळ पाणी योजनेचा विद्युतपुरवठा खंडित केल्याचे समजले. महावितरणच्या अधिकार्यांशी बोलणे आहे. बिलाची काही रक्कम अदा करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये म्हणून जनरेटरवर पाणीपुरवठा केला जात आहे. – गणेश गायकर, ग्रामविकास अधिकारी नेरळ ग्रामपंचायत