नगरपंचायतीचे 25 लाख जाणार पाण्यात
| माणगाव | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा माणगाव काळ नदीवर असणारा ब्रिटिशकालीन पूल हा वाहतुकीसाठी अपुरा पडत असल्याने या पुलालगत दुसरा नवीन पूल शासनाकडून बांधण्याचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे या पुलाच्या विस्तारीकरणात पुलालगत असणारा माणगावकरांचा गणपती विसर्जनाचा घाट दि. 10 सप्टेंबर 2018 रोजी माणगाव नगरपंचायतीने 24 लाख रुपये खर्चून बांधला होता. महामार्गाच्या या पुलाच्या बांधकामाआड असल्याने या गणपती विसर्जन घाटावर महामार्गवाल्यांचा हातोडा पडणार आहे. यामुळे माणगाव नगरपंचायतीचे लाखो रुपये पाण्यात जाणार आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव बाजारपेठेत गणेशोत्सव, होळी तसेच सण-उत्सव, लग्नसराई, सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये प्रवासी नागरिकांना वाहतूक कोंडीशी सामना करावा लागतो. त्यातच पर्यटकांची वर्दळ यामुळे मुंबई बाजूकडून कोकणात जाणार्या पर्यटक प्रवासी नागरिकांना माणगाव रेल्वे स्थानकापासून काळ नदीवरील पुलापर्यंत वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. तसेच कोकण व तळ कोकणातून येणार्या वाहनांना काळ नदी पुलापासून ते रेल्वे स्थानकापर्यंत वाहतूक कोंडीत तासंतास अडकून पडावे लागते. यामुळे प्रवाशांचा वेळ, पैसा वाया जातो. तसेच हालही होतात. माणगाव काळ नदीवरील पूल हा ब्रिटिशकालीन असून, त्या पुलावर अनेक वेळा छोट्या-मोठ्या दुरुस्त्या झाल्या आहेत. मात्र, हा पूल वाहतुकीसाठी अपुरा पडत असल्याने या पुलावर वाहतूककोंडी सतत होते. त्यामुळे प्रवासी, नगरिक व ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून या पुलालगत नवीन पूल बांधण्यात येत आहे.
या नवीन पुलाचे बांधकाम शासनानी एका ठेकेदारामार्फत सुरु केले असून, हा पूल 105 मीटर लांब व 16 मीटर रुंदीचा असणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कळमजे गावचे फाट्यावर गोद नदीवरील ब्रिटिशकालीन पूल हा कमकुवत झाल्याने व पावसाळ्यात या पुलावर पुराचे पाणी वाहते यामुळे हा पूल नव्याने बांधण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर असणारा महत्त्वाचा पूल अशा तीन पुलांच्या बांधकामासाठी 21 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. माणगाव काळ नदीवरील पुलाचे डिसेंबर 2023 पूर्वी संबंधित ठेकेदारामार्फत पूर्ण करावयाचे आहे. या पुलाचा पाया काळ नदीत खोदकाम करून संबंधित ठेकेदाराकडून सुरु करण्यात आला आहे. मात्र, या पुलाच्या बांधकामाआड गणपती विसर्जन घाट येत असल्याने तो तुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी गणेशोत्सवात गणेशभक्तांना काळ नदीत गणपती विसर्जन करताना गणपती विसर्जन घाटाची उणीव भासणार आहे. नगरपंचायतीला हा गणपती विसर्जन घाट तुटणार की नाही? याबाबत महामार्ग विभागाने कोणतीही पूर्वसूचना वा लेखी नोटीस दिली गेली नाही. यामुळे सर्वच अनभिज्ञ आहेत.
गणेशभक्तांना, महिला व वृद्धांसाठी निवारा व बैठकीसाठी गणपती घाटाची सोय करण्यात आली होती. गणपती विसर्जन घाट 2018 रोजी सुमारे 24 लाख रुपये खर्च करून बांधला आहे. हे बांधकाम तुटणार आहे की नाही? याबाबत नगरपंचायतीला संबंधित खात्याने कळविलेले नाही.
ज्ञानदेव पवार, नगराध्यक्ष, माणगाव