। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव – मोर्बा रस्त्यावर खांदाड गावच्या हद्दीत पेट्रोल पंपाजवळ गटार काढण्याचे काम करीत असताना निघालेल्या माहितीचे ढिगारे रस्त्यावर टाकल्याने हि माती पावसाच्या पाण्याने रस्त्यावर येऊन अपघाताला निमंत्रण देत आहे. गेले तीन दिवसांत या ठिकाणी दोन ते तीन अपघात झाले आहेत. तरी नगरपंचायतीने या प्रश्नाकडे विशेष लक्ष देऊन हे माहितीचे ढिगारे लगेचच उचलावेत अशी मागणी माणगाव येथील कोकण विभागीय भाजप किसान मोर्चाच्या महिला अध्यक्षा शर्मिला सत्वे यांनी केली आहे.
हा रस्ता दिघी-पुणे राज्य महामार्गामुळे नेहमीच गजबजलेला असतो. शिवाय या मार्गावरून श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर याठिकाणी पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी जात असतात. तसेच माणगाव ते मोर्बा या पाच किमीच्या अंतरावर सतत रिक्षा व दुचाकी धावत असतात. सध्या पावसाचे दिवस चालू असून या रस्त्यावर माणगाव नगरपंचायतीने पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी गटाराचे काम केले आहे. मात्र हे काम करीत असताना तेथून निघालेली मोठ्या प्रमाणात माती याचे ढिगारे नगरपंचायतीने रस्त्यावर करून ठेवल्याने हि माती पावसाच्या पाण्यामुळे हळूहळू रस्त्यावर वाहत येऊन रस्ता चिखलमय होऊन त्यातून दुचाकी वाहनांचे अपघात होत आहेत. याकडे नगरपंचायतीने खास लक्ष देऊन हि सर्व मातीची ढिगारे लवकरात लवकर उचलून होणारे अपघात टाळावेत अशी मागणी शर्मिला सत्वे यांनी केली आहे.