| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी ठरणार आहे. सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड, न्या. कृष्ण मुरारी आणि न्या. पी. एस. नरसिंहा यांच्या त्रिसदस्यीय पीठापुढे या याचिकांवर मंगळवारी सुनावणी ठेवण्यात आली आहे. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय घटनापीठाचे कामकाजही मंगळवारी होणार असून ते कामकाज झाल्यावर निवडणुकांबाबतच्या याचिकांवर सुनावणी होणार आहे. ही सुनावणी झाल्यास दीर्घकाळ रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा केला जाण्याची शक्यता आहे.