ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आजपासून तीन दिवस सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. सुप्रीम कोर्टात तूर्तास पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर ही सुनावणी पार पडत आहे. निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्हाबाबत दिलेल्या निर्णयाबाबत ठाकरे गटानं दाखल केलेल्या याचिकेवर कोर्ट उद्या दुपारी साडेतीन वाजता सुनावणी करणार आहे.

ठाकरे गटासाठी मोठा दिलासा देणारी ही बातमी आहे. उद्या दुपारी 3.30 वाजता घटनापीठ यावर निर्णय घेईल. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर निवडणूक आयोगाच्य निर्णयाला स्थगिती मिळणार की नाही याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. ठाकरे गटाच्या याचिकेचं मेन्शनिंग करण्यास काल सुप्रीम कोर्टानं निर्देश दिले होते. निवडणूक आयोगाने शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह बहाल केलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. यावर काल तात्काळ सुनावणीस सुप्रीम कोर्टानं नकार दिला होता. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाकडून आव्हान दिलं जाण्याची शक्यता गृहित धरून शिंदे गटाने यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. आमचं म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय निर्णय देऊ नये, अशी विनंती शिंदे गटाने सुप्रीम कोर्टाला केली होती.

शिंदे गटाचे वकिल कौल म्हणाले, ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात येण्याची गरज नाही. यापूर्वी देखील ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. मात्र दोनदा हायकोर्टाने नकार दिला आहे. त्यावर आत्ता या प्रकरणवर चर्चा नको, उद्या दुपारी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकले जाईल, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

Exit mobile version