। दिल्ली । वृत्तसंस्था ।
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळालं. केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्वव ठाकरे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “न्यायालयाचा निर्णय येण्याआधी निर्णय देण्याची निवडणूक आयोगाने एवढी घाई का केली? निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात लवकरात लवकर सुप्रीम कोर्टात जाणार असून निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
त्यानंतर उद्धव ठाकरेंनी आज सुप्रीम कोर्टात धाव घेतली. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका ठाकरे गटाने आज सुप्रीम कोर्टासमोर मांडायचा प्रयत्न केला. मात्र सुप्रीम कोर्टानं आज याचिका दाखल करून घेण्यास नकार दिला आहे. त्यावर कोर्टाने त्यांना उद्या मेन्शनिंग लिस्ट अंतर्गत येण्यास सांगितले आहे.