जिल्ह्यातील नद्या इशारा पातळीजवळ; रस्ते जलमय, जनजीवन विस्कळीत
| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यामध्ये रेड अलर्टचा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार जिल्ह्यात रविवारीपासून सुरू असलेल्या धुवाँधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून, रस्ते जलमय झाले आहे. या पावसात शेतांसह नद्या, विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. जिल्ह्यातील अंबा, सावित्री, पाताळगंगा, गाढी अशा सहा नद्यांची पातळी इशारा पातळीपेक्षा कमी आहे. मात्र, असाच पाऊस सुरू राहिल्यास इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या पावसात अनेकांच्या घरांची पडझड झाली असून शेळ्या-मेढ्यांचा मृत्यू झाल्याने पशुपालकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने जिल्हाभरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. अलिबाग शहरातील कामगार नाका परिसरासह अलिबाग एसटी बसस्थानकात पाणी साचले आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. जिल्ह्यातील माणगावमधील पजगावजवळ रस्त्यावर दरड कोसळली. सुदैवाने जीवितहानी टळली. परंतु, या मार्गावरील वाहतूक सेवा ठप्प झाली होती.
पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून, जिल्ह्यातील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे मार्गावरील वाहनांचा वेग मंदावला. काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहने चालविताना तारेवरची कसरत करण्याची वेळ वाहन चालकांवर आली. जिल्ह्यामध्ये पडलेल्या पावसामुळे विहिरींसह धरणेदेखील पाण्याने भरून गेली आहेत. जिल्ह्यातील 28 लघु पाटबंधाऱ्यांपैकी वावा, आंबेघर, श्रीगाव, कोंडगांव, घोटवडे, ढोकशेत, कवेळे, रानिवली, वरंध, साळोख, कलोते-मोकाशी, डोणवत, मोरबे, बामणोली, उसरण, पुनाडे या 16 धरणांमध्ये 50 टक्के जलसाठा झाला आहे. तसेच कार्ले, कुडकी, अवसरे या धरणांमध्ये 75 टक्के, कोथुर्डे, खैरे या धरणांमध्ये 99 टक्के आणि सुतारवाडी, उन्हेरे, पाभरे, संदेरी, खिंडवाडी, भिलवले या धरणांमध्ये शंभर टक्के जलसाठा झाल्याची माहिती लघु पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे धरणांजवळील अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. दरडग्रस्त व पूरग्रस्त गावांतील नागरिकांना सूचना देण्यात आल्या असून, तालुक व ग्रामपातळीवरील प्रशासनाला लक्ष ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून दिल्या आहेत.
जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गासाठी रस्त्याच्या कडेला असलेले डोंगर पोखरण्यात आले आहेत. माती, दगडांचा वापर भरावासाठी केला आहे. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांकडील दुतर्फा दरडीचा धोका निर्माण झाला आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने दुर्लक्ष केल्याने हानी पोहोचण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
नद्यांवर दृष्टीक्षेप (संध्याकाळी पाच वाजेपर्यंत)
| नदीचे नाव | इशारा पातळी | धोका पातळी | सध्याची पातळी |
| सावित्री नदी | 6 मीटर | 6.50 मीटर | 3.50 मीटर |
| अंबा नदी | 8 मीटर | 9 मीटर | 7 मीटर |
| कुंडलिका नदी | 23 मीटर | 23.95 मीटर | 22.65 मीटर |
| पाताळगंगा नदी | 20.50 मीटर | 21.52 मीटर | 19.90 मीटर |
| गाढी नदी | 6 मीटर | 6.55 मीटर | 2.35 मीटर |
| उल्हास नदी | 48.10 मीटर | 48.77 मीटर | 43.50 मीटर |
पक्क्या घरांसह झोपडीचे नुकसान
मागील 24 तासांमध्ये सरासरी 72.1 मि.मी. पाऊस पडला आहे. खालापूरमध्ये 108 मि.मी. माणगावमध्ये 104 मि.मी., तळामध्ये 145 मि.मी. पोलादपूरमध्ये 107 मि.मी. इतकी पावसाची नोंद आहे. सर्व तालुक्यांमध्ये शंभर मि.मी.पेक्षा कमी पाऊस असल्याचे सांगण्यात आले आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील 11 पक्क्या घरांची पडझड झाली आहे. एका झोपडीचे पूर्णतः नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील माणगावमधील आठ पक्क्या घरांचे नुकसान झाले आहे. तळामधील परीटवाडी येथील संतोष तळेकर यांच्या शेडवर झाड पडून नुकसान झाले आहे. पावसामुळे वाशी महागांवमधील रमेश टेमकर यांचे दोन बोकड व एका शेळी मृत्यू झाला आहे. अतिवृष्टीमुळे खोपोलीमधील भानवज गावातील काजूवाडी येथील देवकी पवार यांचे कुडामातीचे घर कोसळले. सुदैवाने जीवितहानी टळली. अलिबाग तालुक्यातील चौल येथील सुरेश घरत यांच्या राहत्या घरावर झाड कोसळल्याने घराचे नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
उद्या यलो अलर्ट
हवामान खात्याने सोमवारी यलो अलर्ट जारी केला होता. त्यानुसार जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला. मात्र, मंगळवारीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच बुधवार-गुरुवारी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






