| खोपोली | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यात शनिवारी पावसाची उघडझाप राहिली. तुरळक सरी वगळता दिवसभरात काहीवेळ सूर्याने डोकं वर काढीत ऊन राहिले. त्यामुळे नद्या-नाल्यांच्या पाणी पातळीत घट होत असून, पातळगंगी नदीचे काही फुटानी कमी झाली आहे.तर दिवसभर पावसाच्या उघडझापमुळे जनजीवन पूर्वपदावर आल्याचे चित्र पहावयास मिळाले.
गेल्या आठवड्यापासून मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. पाताळगंगा नदीने व विविध भागातून येणार्या जोडनद्यांनी पातळी ओलांडली होती. तर खोपोली शहरातील मुख्य नाले भरल्याने सकल भागात पाणी साठल्यामुळे पालिका प्रशासनाची तारंबळ उडाली होती. पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोली, खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनुप दुरे, खालापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी रश्मी चव्हाण, खालापूर पोलीस निरीक्षक अनिल विभूते, खोपोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिरिष पवार यांच्या टीमसह अपघातग्रस्त टीम अहोरात्र आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नियोजन करीत लक्ष ठेवून आहेत.
शनिवारी पावसाने उघडीप ठेवल्यामुळे पाटबंधारे उपविभाग, कर्जत विभागाच्या माहितीनुसार, शनिवार, दि. 16 जुलै 2022 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत पाताळगंगा नदी खालापूर, पाणी पातळी 19.00 मी, इशारा पातळी – 20.50 मी., धोका पातळी – 21.53 मी. स्थिती होती. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे शेतकर्यांनाही शेतीची कामे करण्यासाठी मदत झाली. तर, खोपोली बाजारातही बर्यापैकी गर्दी पहावयास मिळाली.